आंदोलनानंतरही केवळ २ विषयांना उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा देण्याचा निर्णय !

सोलापूर विद्यापिठाकडून स्वत:च्या चुका लपवण्याचा प्रयत्न

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठातील परीक्षा विभागाकडून वारंवार न्यून गुण देणे, उपस्थित विद्यार्थ्याला अनुपस्थित दाखवणे, यांसारख्या गंभीर चुका होत आहेत. या चुका समोर येऊ नयेत, यासाठी उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा न देण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला होता. यावर विद्यार्थी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय विद्यापिठाने मागे घेतला; मात्र नव्या नियमावलीनुसार ही सुविधा विद्यार्थ्यांना केवळ २ विषयांसाठी मिळणार आहे. त्यामुळे ‘२ हून अधिक विषयांत अशा चुका झाल्यास काय करायचे ?’, हा प्रश्न अजूनही कायम आहे. संगणकीय पद्धतीने उत्तरपत्रिकेची पडताळणी होत असूनही विलंबाने निकाल घोषित करणे, तसेच निकालाची छापील प्रत देण्यात दिरंगाई करणे, असे प्रकार विद्यापिठात सातत्याने घडत आहेत. (स्वतःला विद्यार्थीकेंद्रीत म्हणवणार्‍या सोलापूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे विद्यार्थी आणि पालक यांना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)