स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !

आज १० ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘जागतिक मानसिक आरोग्यदिन’ आहे. त्या निमित्ताने….

प्रत्येक वर्षी १० ऑक्टोबर या दिवशी ‘जागतिक मानसिक आरोग्यदिन’ साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर वाढत्या मानसिक अनारोग्याविषयी जागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने हा दिन साजरा करण्याचे ठरवले. सद्यःस्थितीला सगळीकडेच जीवन जगण्यासाठी जी धडपड करावी लागते, त्याने निराशा आणि ताणतणाव अशा अनेक मानसिक अडचणींना मनुष्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामुळे मनुष्य मानसिक आरोग्य पूर्णतः गमावून बसला आहे. मानसिक आरोग्य चांगले ठेवून निरोगी रहाणे आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे. मनुष्याचे मन जसे असेल, तसेच त्याच्या भोवतीचे वातावरणही बनते. त्यामुळे बाह्य परिस्थिती प्रतिकूल असतांनाही मन शांत, स्थिर, सुदृढ आणि निरोगी कसे राहील, यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

श्रीमती धनश्री देशपांडे

कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी मानवाने अध्यात्माची कास धरायला हवी !

आपण परिस्थितीच्या मागे वहावत जाण्यापेक्षा मनाला योग्य दिशा देऊन योग्य पथावर आणणे आपल्याच हातात असते. प्रत्येकच मनुष्यामध्ये गुणदोष आहेत. प्रतिकूल परिस्थितीत मनाची स्थिरता नष्ट होऊन मनुष्य दोषांच्या आहारी जातो. त्याच वेळी मनाचा कस लागतो. भावनाशीलता, अतीविचार करणे, आत्मकेंद्रितपणा, मला कळते, न्यूनगंड, नकारात्मकता, ऐकण्याची वृत्ती नसणे अशा अनेक दोषांमुळे मनुष्य परिस्थितीमध्ये अडकून स्वतःचे मानसिक आरोग्य गमावून बसतो. कुठलीही परिस्थिती शांतपणे आणि सकारात्मकतेने हाताळणे सामान्य मनुष्यालाही सहज शक्य आहे. त्यासाठी मानवाने अध्यात्माची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. दुसर्‍या बाजूला परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या मनाचा सखोल अभ्यास करून अंतर्मुख होणे आवश्यक आहे.

सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !

आज समाजाची बहिर्मुखता प्रचंड प्रमाणात वाढल्याने स्वतःचे आचारण, मन, स्वभावदोष, अहं आणि स्वतःतील उणिवा या पैलूंकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत स्वभावदोष उफाळून आल्याने अयोग्य निर्णय घेतले जाणे, पराकोटीची चुकीची कृती होणे, तडजोड करण्याऐवजी ‘एक घाव दोन तुकडे’, अशा प्रकारचे आचरण होतांना दिसते. ‘मनावर १०० टक्के ताबा मिळवता येणे शक्य आहे’, असे अनेक मानसोपचार तज्ञांनी सांगितले आहे. त्यासह अनेक संतांनी मन आणि इंद्रिये यांवर ताबा मिळवल्याची उदाहरणेही आहेत. संतांनी शिकवल्याप्रमाणे आचरण केल्यानेच मानवाला मन आणि इंद्रिये यांवर ताबा ठेवणे शक्य होते. केवळ स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालता येऊ शकतो. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन झाल्यानंतरच मनुष्याचे मानसिक आरोग्य टिकून रहाणार आहे आणि एक सुदृढ समाज निर्माण होणार आहे. असा समाज निर्माण होण्यासाठीच सनातन संस्था गेल्या अनेक वर्षांपासून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकवत आहे. ही प्रक्रिया राबवल्याने जीवनात पदोपदी उद्भवणारी परिस्थिती आणि अडचणी यांवर मात करण्यास मन सिद्ध होते. एक निरोगी सुदृढ मन निर्माण करण्याचा हाच रामबाण उपाय आहे !

 – श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा (८.१०.२०२२)


मानसिक आरोग्य चांगले रहाण्यासाठी व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक आहे. हे समजून घेण्यासाठी या विषयावर आधारित सनातन संस्थेच्या ग्रंथांचा अवश्य लाभ घ्या !


हे ग्रंथ online खरेदी करण्यासाठी क्लिक करा :
https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-spiritual-practice-for-god-realisation/mr-personality-development/