धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकारही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा प्रसिद्ध प्राध्यापक शंकर शरण यांचा मासिक ‘प्रथम इम्पॅक्ट’मध्ये प्रकाशित झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत. या लेखाचा पूर्वार्ध २०.९.२०२२ या दिवशीच्या अंकात आपण पाहिला. (उत्तरार्ध)

डॉ. शंकर शरण

६. भारतात विविध धर्म आणि समुदाय एकोप्याने रहाण्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज अन् त्याच्या परंपरा यांना जाणे

मुसलमानांशी चर्चा केल्यास विविध समुदायांमध्ये मानसन्मान केवळ बरोबरी आणि परस्पर साहाय्य यांवरच चालू शकतात, ही गोष्ट बहुतांश मुसलमान मान्य करतील. जर एक धर्ममत दुसर्‍या धर्ममताला आणि त्याच्या देवीदेवता यांना खोटे, तुच्छ, निर्बल आदी संबोधून नियमितपणे अपमानित करत असेल, तर त्यांना दुसर्‍यांकडून त्यांच्या धर्मासाठी सन्मानाची गोष्ट करण्याचा अधिकार नाही. तसे करणे अनैतिक आहे. त्याच्यासाठी कितीही प्रक्षुब्ध झाले किंवा हिंसाचार केला, तरी ते अनुचित आहे. यात त्यांना अपयशच येईल.

समान व्यवहाराचा हा सल्ला केवळ भारतातच करणे शक्य आहे; कारण जगात भारतातच विविध धर्म आणि समुदाय शांततेत रहात आले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज आणि त्याच्या परंपरा यांना जाते, ज्याच्या आचरणाला धर्माचा आधार सांगण्यात आला आहे. त्यामुळेच भारतात यहुदी, पारशी, ख्रिस्ती, इस्लामी यांना सहजपणे स्थान आणि सन्मान दिला जातो. हे मूळ सत्य असून हिंदूंच्या उदारतेचा स्वीकार करूनच खरा संवाद होऊ शकतो.

७. राजकीय नेते आणि माध्यमांतील प्रतिष्ठित यांनी सत्यनिष्ठ भूमिका घेण्याऐवजी राजकारण करणे

भारतात मूळ सत्य नाकारून प्रत्येक प्रसंगी हिंदु समाजाला दोषी ठरवण्याची चळवळ सतत चालवली जाते. ही एक भयानक विकृती आहे. दंगली आणि वादविवाद इत्यादींमध्येही हेच दिसून येते. हिंदूंच्या विरोधात संघटित आणि भयंकर हिंसाचार घडला, तर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो. काश्मीरपासून गुजरात आणि आसामपासून केरळपर्यंत अनंत वेळा हेच झाले आहे. मारेकर्‍यांची ओळखही लपवली जाते. याउलट धर्मांधांच्या हिंसाचाराला प्रत्युत्तर देतांना हिंदू आक्रमक झाले, तर संपूर्ण जगात ‘हिंदु फॅसिझम्’, ‘असहिष्णुता’, ‘अल्पसंख्यांकांवर अत्याचार’ आदी अंतहीन दुष्प्रचार आणि विलाप चालू होतो. त्यात सर्व बोध आणि यथार्थ बोध यांना तिलांजली दिली जाते.

ही सर्व हिंदूंवर केलेली दुप्पट तिप्पट जखम आहे. आज माहिती-तंत्रज्ञानाचे स्वरूप व्यापक झाल्यामुळे अशी प्रत्येक घटना, वक्तव्य किंवा कृत्य यांविषयी लाखो लोकांना लगेच सत्य समजते. वारंवार अशा जखमा झाल्याने त्यांच्यात दु:ख, क्षोभ आणि आक्रोश निर्माण होतो. राजकीय पक्षांकडून प्रत्येक प्रसंगात पीडित समाजाचे तोंड पाहून प्रतिक्रिया दिल्याने यात अधिकच भर पडते. दुर्दैव आहे की, आमचे नेते आणि माध्यमांतील प्रतिष्ठित यावर सत्यनिष्ठ भूमिका स्वीकारण्याऐवजी राजकीय पोळ्या भाजणे चालू करतात. त्यांचे समर्थकही आपसांतच वाद करणे चालू करतात. परिणामी सामुदायिक संबंधांचे समान मापदंड बनवणे किंवा धर्म-विश्वास यांची टीका सहजपणे स्वीकारण्यास सांगण्याची संधी पार्टीबाजीमुळे नष्ट होते. यात सामुदायिक द्वेष आणि संशय वाढत जातो.

८. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि प्रचारयंत्रणा यांनी मुसलमानांवर अन्याय होत असल्याच्या खोट्या गोष्टी पसरवणे

जर पक्षबंदीच्या पलीकडे जाऊन आणि संपूर्ण प्रकरणावर समभावाने विचार केला, तर यावर सहजपणे उपाय मिळू शकतो. विशेषत: भारतात हिंदूंची उदारता ऐतिहासिक रूपाने संपूर्ण जगात सुपरिचित राहिली आहे. वेळोवेळी विविध ख्रिस्ती आणि मुसलमान नेत्यांनीही हे सत्य स्वीकारले आहे. त्या मुसलमान नेत्यांमध्ये देशी-विदेशी दोन्ही सहभागी राहिले आहेत. ते समजतात, ‘भारतात मुसलमानांना जेवढी शांती, सुविधा, स्वातंत्र्य आणि उन्नती यांच्या संधी आहेत, तेवढ्या मुसलमान देशांतही मिळत नाहीत. हे वास्तव कुणीही तपासू शकतो. आजच्या काळात तर सहजपणे घरी बसून तपासता येते; परंतु येथे संपूर्णपणे उलट होत आहे. विविध राजकीय पक्ष, देशी-विदेशी संस्था आणि निहित स्वार्थी प्रचारयंत्रणा मुसलमानांच्या विरुद्ध भेदभाव अन् अन्यायाच्या खोट्या गोष्टी पसरवत राहिले. त्यामुळे कोट्यवधी अज्ञानी मुसलमानांमध्ये विशेषत: धार्मिक गोष्टींच्या संदर्भात चुकीच्या भावना भरल्या जातात. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीनही देशांमध्ये हिंदूच सातत्याने घायाळ होत आहेत, तसेच अपमानही सहन करत आहेत. दुटप्पी राजकीय पक्ष आणि माध्यमे असतांनाही याविषयीची वृत्ते अन् चित्रफिती समोर येत असतात.

९. लांगूलचालनाच्या प्रश्नावर हिंदूंची मते मिळवणार्‍या राजकीय पक्षांनी सत्ता आल्यावर पूर्वीचे तुष्टीकरण चालूच ठेवणे

पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंना कनिष्ठ दर्जाची वागणूक मिळते. त्यांची मंदिरे, कुटुंबे आणि संपत्ती यांवर नियमितपणे आक्रमणे होत असतात. भारतातही हिंदू त्यांचे शिक्षण आणि मंदिरांचे संचालन अशा जीवनातील दोन सर्वांत मूलभूत क्षेत्रांमध्ये ख्रिस्ती अन् मुसलमान यांना मिळालेल्या अधिकारांपासून वंचित आहेत. अशा प्रकारे येथेही त्यांना दुसर्‍या दर्जाचे नागरिक बनवण्यात आले आहे. हिंदूंची अशी दुर्दशा तर ब्रिटिशांच्या राजवटीतही नव्हती. जे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी यावर ‘मुसलमानांचे लांगूलचालन’ म्हणून प्रश्न उपस्थित करून हिंदूंचे समर्थन मिळवले, त्यांनीही सत्ता मिळाल्यानंतर तेच तुष्टीकरण पुढे चालू ठेवले. ‘हिंदू त्यांच्याच खिशात आहेत’, असे समजून आता ते लांगूलचालनाच्या पुढे जाऊन ‘तृप्तीकरण’ ही घोषणा देत आहेत. जसे एका विदेशी अवलोकनकर्त्याने नोंद केले आहे, ‘हिंदु राजकीयदृष्ट्या अनाथ आहेत !’ हिंदूंची अशी दुर्दशा ब्रिटीश राजवटीतही नव्हती.

१०. शासनकर्ते आणि माध्यमे यांनी हिंदूंना दुटप्पीपणाची वागणूक देणे, हे देशासाठी हानीकारक !

याच दुर्दशेचे हे नवीन उदाहरण आहे की, स्वधर्माच्या रक्षणासाठी दुसर्‍यावर टीका केली; म्हणून कोणतेही अन्वेषण आणि सुनावणी न होता नूपुर शर्मा यांना त्वरित शिक्षा करण्यात आली. यातून कठोरपणे हा संदेश देण्यात आला आहे की, भारतात हिंदु धर्म, देवता, परंपरा यांच्याविषयी घृणास्पद सांगणे, हे दुसर्‍यांचे शिक्षण आणि अधिकार आहे. असेच शिक्षण आणि प्रसार यांच्यासाठी विशेष राजकीय अनुदान अन् नवनवीन संस्था स्थापित करण्यात येत आहेत. दुसरीकडे कोणताही हिंदु सत्य पुरावा असतांनाही दुसर्‍या पंथाला अत्याचारी आणि अंधश्रद्धाळू म्हणू शकत नाही ! त्यासाठी त्याला लगेच ठार मारण्याचे आवाहन केले जाते, तसेच पोलीस आणि न्यायालयीन कारवाईही चालू होते. त्या हिंदूचे समर्थन करणार्‍यावर प्राणघातक आक्रमणे होतात आणि इतरांनाही तशाच धमक्या दिल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेत राज्यव्यवस्था आणि माध्यमे यांचा घोर दुटप्पीपणा दिसून येतो. अशा घटना आणि प्रवृत्ती देशासाठी हानीकारक आहेत.

११. मानवीय विवेक आणि समानता यांनाच विचार-विमर्श यांचा आधार बनवायला हवा !

भारतीय नेते, माध्यमांतील मोठ्या व्यक्ती आणि प्रतिष्ठित यांनी धार्मिक टीकांविषयी सोपे अन् सारखे निकष बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धार्मिक भावनांशी संबंधित ऐतिहासिक आणि सध्याचे सर्व प्रश्न यांच्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यात कुणाला विशेषाधिकार बनवण्याचा आग्रह आणि त्यासाठी हिंसाचाराचा विचार लगेच फेटाळला पाहिजे. दुटप्पी नैतिकतेच्या ऐवजी समान नैतिकता आणि मानवीय विवेक यालाच आधार बनवला पाहिजे. सतत कसेही करून शांती रहावी, यासाठी एका बाजूने देवाण-घेवाण नीती अवलंबल्याने हिंसकांनाच प्रोत्साहन मिळते. सगळ्या प्रकारचे विशेषाधिकार फेटाळले पाहिजेत. असे करूनच मागील शतकांमध्ये युरोप आणि अमेरिका प्रगती करू शकले. त्यांनी चर्चचा प्रभाव आणि मतवाद यांना धुडकावून मानवीय विवेक अन् समानता यांनाच विचार-विमर्श यांचा आधार बनवला. तेव्हाच ते विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाही यांचा विकास करू शकले. अर्थात् कोणतेही मत-विश्वास, नेते, प्रेषित, व्यवहार, कायदे आदींना स्वीकारणे, नाकारणे किंवा त्यांच्यावर टीका करणे हा अधिकार जो एका समुदायाला आहे, तो सर्वांनाच देणे, हा उपाय आहे. तोच अधिकाधिक सत्यापर्यंत पोचण्याचा आणि मानवीय उन्नतीचा मार्गही आहे.

या गोष्टी सामान्य लोक समजू शकतात. केवळ मतवादी आग्रह, राजकीय स्वार्थ आणि दबाव यांमुळेच त्यांना बाधा पोचवली जाते. ही बाधा दूर झाली पाहिजे. तेव्हाच जसे शशी थरूर (काँग्रेसचे नेते) यांना वाटते, ‘प्रत्येक व्यक्तीला धर्माविषयी त्याचा व्यवहार स्वत: ठरवण्याचा अधिकार मिळू शकेल. हा अधिकार सर्व धर्मांविषयी लागू झाला पाहिजे.’

– प्रा. शंकर शरण, नवी देहली

https://sanatanprabhat.org/marathi/613800.html (लेखाचा पूर्वार्ध)