आततायी आणि आतंकवादी यांना पाठीशी घालणे, म्हणजे आत्मघात ! – लोकमान्य टिळक

आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

वर्ष १८९३ मध्ये मुंबईत हिंदु आणि मुसलमान यांच्यात पहिली दंगल झाली. लोकमान्य टिळक यांच्या लेखसंग्रहातील पहिला राजकीय खंड आपण वाचला, तर त्यात या विषयावरील अनेक लेख आढळतील. प्रत्येक लेखामध्ये त्यांनी अनेक उदाहरणे देऊन असे स्पष्ट केले आहे, ‘सरकारी अधिकारी मुसलमानांची गय करतात आणि त्यांना अप्रत्यक्षपणे फूस देतात. गोरक्षणाच्या चळवळीने धर्मांध मुसलमान चिडून दंगलीला प्रवृत्त होतात.’ यांसारखी जी कृत्ये ब्रिटीश अधिकारी गंभीरपणे करत होते, त्याचा टिळकांनी घेतलेला खरमरीत समाचार निरंतर उपयोगी पडणारा आहे. लोकमान्य टिळक यांचा त्या वेळचा विचार हा अत्यंत कठोर होता. आज आपल्याला हेच चित्र दिसते. धर्मांध मुसलमानांच्या अत्याचारी प्रवृत्तीला पाठीशी घालणारे अनेक राजकीय नेते आहेत. या विषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

लोकमान्य टिळक

१. सौराष्ट्रातील दंगलीच्या विरोधात हिंदूंनी सभा घेणे आणि त्या सभेच्या विरोधात मुसलमानांनी संतप्त होऊन दंगल घडवणे

सौराष्ट्राच्या एका माजी संस्थानातील प्रभासपट्टण तीर्थाच्या गावी प्रथम हिंदु-मुसलमानांचा दंगा झाला. तेथील हिंदूंना साहाय्य करण्याच्या हेतूने मुंबईत एक सभा आयोजित करण्यात आली. त्यापूर्वी मुसलमान समाजाने अशीच एक सभा त्यांच्या धर्मबंधूंच्या साहाय्यार्थ भरवली होती. त्या सभेच्या विरोधात हिंदूंनी एक शब्दही उच्चारला नव्हता; पण हिंदूंच्या सभेने मुसलमान संतप्त झाले. ११ ऑगस्ट १८९३ या दिवशी हातात काठ्या नसलेले मुसलमान दुपारच्या नमाजपठणासाठी जुमा मशिदीत गेले. नमाजपठण करून बाहेर पडले, ते हातात काठ्या घेऊन. बाहेर येताच त्यांनी हिंदूंना चोपण्यास आरंभ केला.

२. दंगलीच्या वेळी हिंदू आणि पोलीस बेसावध असणे अन् नंतर हिंदूंनी पोलिसांच्या भरवशावर न रहाता कायदा हातात घेणे

त्यापूर्वी १५ दिवस एकूणच वातावरण सौराष्ट्राच्या माजी संस्थानात झालेल्या दंग्याच्या बातमीने तंग होते. नेमक्या कोणत्या दिवशी दंगा माजेल, याची हिंदूंना कल्पनाही नव्हती. त्या दिवशी हिंदू सावध नव्हते. त्यामुळे त्यांना मार खावा लागला. हिंदूंप्रमाणे पोलीसदलही गाफील होते. पहिल्या दिवशी धर्मांध मुसलमानांना आवरण्यात पोलिसांना यश आले नाही; पण या गुंडांना ‘पोलिसांची भीती वाटेल’, अशी वागणूक संपूर्ण शहरात कुठेही आढळली नाही. दुसरा दिवस उजाडला, तेव्हा पोलिसांवर अवलंबून न रहाता हिंदूंनी कायदा हातात घेतला आणि मुसलमानांच्या दंडाला दंडा भिडवला. तत्क्षणी मुसलमानांचा पारा खाली आला.

श्री. दुर्गेश परुळकर

३. ब्रिटीश अधिकार्यांनी दंग्याविषयी बेधडकपणे चुकीचे विचार लिहिणे आणि त्यातील खोडसाळपणा लोकमान्य टिळक यांनी दाखवून देणे

दंगा संपूर्णपणे मिटवण्यापूर्वीच ब्रिटीश अधिकारी दंग्याविषयी हिंदूंना न पटण्यासारखे विचार बेधडक लिहीत होते. ‘गोरक्षणाची चळवळ हे दंग्याचे मूळ आहे’, ‘हिंदू मुसलमानांशी सहानुभूतीने वागत नाहीत’, ‘त्यांच्याविषयी (मुसलमानांविषयी) वेडेवाकडे, खोटेनाटे लिहितात आणि बोलतात; म्हणून मुसलमान बिथरतात’, अशा आशयाचे लिहीत होते. पुढे जाऊन दंग्याचे पाप काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीच्या माथी मारले जायचे. थोडक्यात पोलीस खाते हिंदूंना जमेल त्या रितीने दूषण (शिव्या) देत होते. ‘हा सर्वच प्रकार खोडसाळपणाचा आहे’, हे दाखवण्याचे काम लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या लेखांतून केले.

४. हिंदु-मुसलमान दंग्याच्या संदर्भात सर्वसामान्यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करणे

हिंदू-मुसलमान दंग्याच्या संदर्भात सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया साधारणपणे पुढील स्वरूपाच्या होत्या, ‘ज्यांना पुढारी समजतात, ते दंग्याचे पुढारी नसतात. दंग्याला चिथावणी देणारी माणसे निराळीच असल्यामुळे निरूपद्रवी पुढार्यांचा जाहीर शांतीपाठ हा दंगा शमवण्याचा खरा उपाय नाही. गोरक्षणाच्या प्रयत्नांमुळे मुसलमान गोमांसाच्या अभावी उपाशी मरू लागल्याचा कुठेही बोभाटा नाही. मग गोरक्षणाच्या चळवळीला नावे ठेवण्यात हशील काय ? गोरक्षणाने एकट्या मुसलमानांनी भडकावे आणि गोमास खाणार्या ख्रिस्त्यांनी स्वस्थ बसावे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.’

५. ‘मुसलमान लोक शेफारण्यास मुख्य कारण सरकारची फूस !’ – लोकमान्य टिळकांचे खडे बोल

हिंदु-मुसलमान दंग्याविषयी लोकमान्य टिळक यांचे विचार पुढे देत आहोत. ‘मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की, सरकार आपल्याला घाबरते. त्यामुळे किंवा हा दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घेणार नाही. सरकार अशा रितीने एका धर्माच्या लोकांना वचकते किंवा अगर त्यांचा फाजील सन्मान ठेवते, अशी कुणाचीही समजूत होणे, हे प्रजेच्या स्वास्थ्यास अपायकारक आहे. सध्या जो प्रकार होत आहे, तो समंजस मनुष्याच्या सल्ल्याने अगर कानाडोळ्याने होतो, असे मानण्यास बिलकुल आधार नाही. मुसलमान लोक जर शेफारले असले, तर आमच्या मते याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय. युरोपियन लोक हिंदु लोकांस नेहमी असे हिणवत असतात की, इंग्रजी राज्य आहे; म्हणून हिंदु लोकांचे मुसलमानांपासून संरक्षण होत आहे. जणू काय मुसलमान लोकांपासून आमचे संरक्षण करण्यासाठीच परमेश्वराने त्यांना पाठवले आहे; परंतु ही समजूत अत्यंत चुकीची आहे. इतकेच नव्हे, तर असल्यासच मुसलमान लोकांना विनाकारण उत्तेजन मिळत गेले आहे. इंग्रज लोक हिंदुस्थान सोडून गेले असता आमचे काय होईल ? याची आम्हाला बिलकुल काळजी नाही. इंग्रजांनी हिंदुस्थानात पाऊल ठेवण्यापूर्वी मुसलमानांची सत्ता मोडत चालली होती आणि इंग्रजांनी हिंदुस्थानचे राज्य कमावले ते मुसलमानांपासून नव्हे, तर मराठी आणि शीख लोकांपासून होय ! जुन्या गोष्टी सांगत बसण्यात काही हशील (अर्थ) नाही. सध्या सरकारास आमचे इतकेच सुचवणे आहे, ‘मुसलमानांची नुसती प्रौढी गाऊन त्यांना हरभर्याच्या झाडावर चढवण्याचा जो नेहमी उद्योग चालू आहे, तो आम्हासच काय; पण एकूण इंग्रजी राज्याला अपायकारक आहे.’ कित्येक सरकारी अधिकारी बर्याच वेळा ही गोष्ट विसरून जाऊन ‘हिंदु-मुसलमानांतील द्वेषभाव कायम राहिला, तरच इंग्रजी राज्याचे हित आहे’, अशा समजुतीने मुसलमान लोकांना चिथवण्याचा हस्ते परहस्ते प्रयत्न करत असतात.’

६. आतंकवाद्यांना पाठीशी घातल्यामुळे झालेली स्थिती !

युरोपियन लोकांनी मुसलमानांना वाजवीपेक्षा अधिक स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच आज त्याची फळे युरोपला भोगावी लागत आहेत. इंग्लंडमध्येही सध्या काय परिस्थिती आहे ? याची आपल्याला कल्पना आहेच. फ्रान्सलासुद्धा देशातील कायदे कडक करावे लागले. आतंकवाद्यांची बाजू घेणे आणि त्यांना पाठीशी घालणे म्हणजे आत्मघात आहे. सध्या अफगाणिस्तानात काय वातावरण आहे, ते सांगण्याची आवश्यकता नाही.

७. राष्ट्राचे हित साधणार्या राष्ट्रभक्तांच्या पाठीशी उभे रहाणे, यातच सर्वांचे कल्याण !

‘आततायी आणि आतंकवाद्यांना फूस लावणे, म्हणजे आत्मघात आहे’, हे लोकमान्य टिळकांनी १२९ वर्षांपूर्वी सांगितले होते. त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत काहीही भेद नाही, हेच आपल्या लक्षात येईल. राष्ट्राचे हित साधणार्या राष्ट्रभक्तांच्या पाठीशी उभे रहाणे, यातच सर्वांचे कल्याण आहे. शत्रू, आततायी आणि आतंकवादी यांची बाजू घेणार्यांनी याचा विचार करावा.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली

भारतीय समाजाच्या मनात ‘स्वातंत्र्य लालसा’ प्रथम लोकमान्य टिळक यांनी निर्माण करणे

वर्ष १८८० ते १९२० हे ‘टिळक युग’ या नावाने ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी सतत ४० वर्षे भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध भारतीय समाजमनात असंतोष निर्माण केला. इंग्रजी राजवट ही प्रथम भारतीय समाजाला सुखावह वाटली. त्या राजवटीचे भारतीय समाज गुणगान करत होता; परंतु ‘आपण परकीय राजवटीत आहोत. आपल्याला स्वातंत्र्य नाही’, हे भान भारतीय समाज विसरला होता. त्या भारतीय समाजाच्या मनात ‘स्वातंत्र्य लालसा’ प्रथम लोकमान्य टिळकांनी निर्माण केली. ‘हिंदुस्थानातील असंतोष’ या प्रसिद्ध पुस्तकात टिळकांना ‘हिंदुस्थानातील असंतोषाचे जनक’, अशी पदवी दिली होती.

(साभार : धर्मभास्कर, वर्ष २००९)

संपादकीय भूमिका

कुठे मुसलमानांना फूस लावणार्या ब्रिटीश अधिकार्यांचा खरमरीत समाचार घेणारे लोकमान्य टिळक, तर कुठे आताचे मुसलमानधार्जिणे संपादक !