मवाळ आणि त्याच वेळी क्रांतीकारक असे लोकमान्य टिळक !

आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

‘क्रांतीपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसेल, तर लोकपक्ष हा शेवटी मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याखेरीज कार्यसिद्धी होऊ शकत नाही. टिळकांच्या जवळ ही समन्वयाची दृष्टी होती. वेळप्रसंग पाहून सर्व मार्ग हाताळण्याची चतुरस्रता होती. एकीकडे ते स्पष्टपणे म्हणत, ‘‘कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास पुढारी एकटा पडतो.’’ दुसरीकडे क्रांतीकारकांना पाठीशी घालण्याचे, कृष्णाजी खाडिलकरांना नेपाळात पाठवून बाँबच्या कारखान्याच्या दृष्टीने काही हालचाल करण्याचे, सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार करण्याचे त्यांचे उद्योगही चालूच असत. मवाळांचे वाटाघाटीचे मार्गही त्यांनी कधी वर्ज्य मानले नाहीत, तसेच वेळप्रसंगी लोकांची तशी ५० टक्के जरी सिद्धता दिसली, तरी सशस्त्र बंडाचा पर्याय दृष्टी आड केला नाही.’

– श्री. ग. माजगावकर (‘स्वातंत्र्यवीर’ दिपावली विशेषांक नोव्हेंबर- डिसेंबर २००७, पृष्ठ २२-२३)