स्कूल जिहाद ?

कर्नाटक राज्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानांचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले. ‘यंग स्कॉलर’ नावाच्या शाळेच्या शिशूवर्गातील विद्यार्थ्यांना दर्गा आणि मशीद येथे नेण्यात आले होते. या मुलांना मशिदीत नमाजपठण करण्यास आणि दर्गा येथे ‘उपदेश’ ऐकण्यास भाग पाडण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील ‘पोद्दार’ शाळेने मनमानी पद्धतीने एक वेगळाच उपक्रम राबवला. प्राथमिक शिक्षण घेणार्‍या कोवळ्या वयातील मुलांना मंदिर आणि मशीद दर्शनाच्या नावाखाली मंदिरात, तसेच मशिदीत घेऊन गेले. राजस्थान येथील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता दुसरीतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना मदर म्हणजे ‘अम्मी’ आणि फादर म्हणजे ‘अब्बू’ असे म्हणायला शिकवले जात आहे. हे ज्या पुस्तकात आहे, त्याचे नाव ‘गुलमोहर’ आहे. पुस्तकातील दुसर्‍या धड्याला ‘ग्रँडपा फारूक्’स गार्डन’ (आजोबा फारूक यांची बाग) असे शीर्षक आहे. ६ व्या धड्यामध्ये पालक स्वयंपाकघरात असून ‘ते बिर्याणी बनवत आहेत’, असे म्हटले आहे. यातून मुलांवर शाकाहाराऐवजी मांसाहाराचे महत्त्व बिंबवले जात आहे.

‘अन्य जिहादप्रमाणे हा एक नवीन ‘स्कूल जिहाद’ तर नाही ना ?’, असा प्रश्न वरील घटना पाहिल्यानंतर पडतो. प्राथमिक शिक्षण घेणार्‍या बालकांची मंदिर आणि मशीद यांतील भेद समजण्याइतकी बुद्धीमत्ता असते का ? त्यातही बळजोरीने मशिदीत जाऊन नमाज पढायला लावणे, दर्ग्यात ‘उपदेश’ ऐकायला लावणे, ‘अम्मी’ आणि ‘अब्बू’ म्हणायला लावणे, म्हणजे बालमनावर होणारा मानसिक अत्याचारच होय. प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलेले असतांना अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची बळजोरी कशासाठी ?

एकीकडे उदयपूर, अमरावती यांसारख्या घटनेमुळे वातावरण संवेदनशील असतांना शाळा प्रशासनाने असे विचित्र उपक्रम कुणाच्या अनुमतीने घेतले ? याची चौकशी होऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. उपरोक्त जळगाव जिल्ह्यातील घटनेत लहान मुलांनी पारंपरिक हिंदु वेशभूषा परिधान केलेली होती. अनेकांच्या हातात भगवे ध्वज होते. त्यावरून काही वाद उद्भवल्यास त्यास कोण उत्तरदायी राहिले असते ? मुख्याध्यापकांची यामागे नेमकी भूमिका काय ? हेही पडताळायला हवे. ‘निधर्मी’ नावाखाली चाललेला हा हिंदूंचा आत्मघात आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन वेळीच जागृत व्हायला हवे !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव