(म्हणे) ‘आमच्या संघटनेचे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही !’  – दावत-ए-इस्लामीचा दावा

कराची (पाकिस्तान) – ‘दावत-ए-इस्लामी’चे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही. आम्ही शैक्षणिक, धर्मप्रचार करणारे आणि परोपकारी संस्था आहोत. जगभरात आम्ही शांततेचा प्रचार करतो, असे वक्तव्य संघटनेचे कराची येथील मुख्यालयातील वरिष्ठ मौलाना महमूद कादरी यांनी केले. उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या मागे ‘दावत-ए-इस्लामी’ संघटना आहे, अशी माहिती पुढे येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या प्रतिनिधीने त्यांना संपर्क केला असता त्यांनी ‘उदयपूरच्या घटनेतील आरोपींच्या कृत्याशी संघटनेचा संबंध नाही’, असे  सांगितले. कन्हैयालाल यांची हत्या करणारे रियाज अत्तारी आणि महंमद गौस यांनी वर्ष २०१५ मध्ये कराची येथे दावत-ए-इस्लामी संघटनेच्या मुख्यालयात काही दिवस राहून प्रशिक्षण घेतले होते.

१. महमूद कादरी पुढे म्हणाले की, जगभरातील सहस्रो विद्यार्थी इस्लामच्या शिक्षणासाठी आमच्या मुख्यालयात येतात. येथे कट्टरतावादाचा प्रसार आणि प्रचार केला जात नाही. आमची संघटना अराजकीय आहे. आमच्या संघटनेच्या जगभरात शाखा आहेत, तसेच संकेतस्थळ आणि दूरचित्रवाहिनीही आहे. आमच्या संघटनेची स्थापना वर्ष १९८१ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत आमचा एकही शिक्षक किंवा विद्यार्थी हिंसाचारात सहभागी झालेला नाही. आम्ही कुणालाही ठार मारण्यासाठी प्रेरित करत नाही. पाकमधील अन्य धार्मिक संघटनांच्या तुलनेत आम्ही कुठल्याही हिंसाचारात सहभागी नाही. मनुष्याने नेहमीच एक दुसर्‍याचा आणि त्यांच्या धर्मांचा मान राखला पाहिजे.

२. नूपुर शर्मा यांच्या विधानाविषयी महमदू कादरी म्हणाले की, कोणताही मुसलमान कधीही पैगंबर यांचा अवमान सहन करणार नाही. कन्हैयालाल यांच्या संदर्भात जे घडले ते योग्य नव्हते. याचे प्रत्येक मुसलमानाला दुःख आहे मग तो कुठेही रहात असो.

३. दावत-ए-इस्लामीचे लाहोर येथील नेते अली अहमद मलिक अटारी यांनी सांगितले की, आमची संघटना पूर्णपणे अहिंसक मार्गाने चालते. आम्ही नेहमीच शांततेचा संदेश देतो.

संपादकीय भूमिका

फ्रान्समध्ये ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाच्या कार्यालयावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आक्रमणात याच संघटनेचा एक विद्यार्थी सहभागी झाला होता, हे यापूर्वीच उघड झाले आहे. कन्हैयालाल यांचे दोघे मारेकरी याच संघटनेच्या कराची येथील मुख्यालयात काही दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते, हे स्पष्ट असतांना या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?