दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील विद्याधिराज सभागृहामध्ये दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होत आहे. या अधिवेशनाच्या प्रथम दिवसाच्या प्रथम सत्राचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. निषाद देशमुख

१. दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सूक्ष्म स्तरीय वैशिष्ट्ये

१ अ. दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे सूक्ष्म स्तरीय परिणाम जनलोकापासून सहाव्या पाताळापर्यंत होणे : ‘आतापर्यंत झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’चे सूक्ष्म स्तरीय परिणाम महर्लाेकापासून पाचव्या पाताळापर्यंत मर्यादित होते. काळानुसार समष्टीची वाटचाल रामराज्याकडे (हिंदु राष्ट्राकडे) होत आहे, तसेच या कार्यात साधना म्हणून सहभागी होणार्‍यांच्या आध्यात्मिक पातळीतही वाढ होत आहे. साधना करणार्‍या समष्टीच्या आध्यात्मिक पातळीत वाढ होत असल्याने अधिवेशनाचे सूक्ष्म स्तरीय परिणाम जनलोकापासून सहाव्या पाताळापर्यंत, म्हणजे अधिक व्यापक सूक्ष्म लोकापर्यंत होत आहेत.

१ आ. समष्टी इच्छाशक्तीमुळे दहावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून एखाद्या आध्यात्मिक सोहळ्याएवढे चैतन्य प्रक्षेपित होणे : ‘अध्यात्म’ हे नित्य नूतन शास्त्र असून ते ‘ब्रह्मा’शी निगडित असल्याने त्यातील तत्त्वांत पालट होत नाही. याउलट राष्ट्ररक्षण, राज्यस्थापना इत्यादी विषय काळाशी निगडित असल्याने त्यांत सतत परिवर्तन होत असते. यामुळे आध्यात्मिक सोहळ्याच्या तुलनेत राष्ट्र इत्यादींशी निगडित सोहळा, सभा, अधिवेशन, यांतून तुलनेत अल्प प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. त्याप्रमाणे वरील नियमाला दहावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ही अपवाद ठरले आहे. वर्तमानकाळात पाताळातील वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे आणि समष्टी प्रारब्ध अधिक वाढलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात साधकांना अधिक त्रास व्हायला हवेत; परंतु दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून एखाद्या आध्यात्मिक सोहळ्याप्रमाणे (चैतन्याचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असणे) चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवते. याचे कारण शोधल्यावर लक्षात आले, ‘दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी समष्टीची इच्छाशक्ती (कार्य होण्याची ओढ किंवा तळमळ) ५० टक्क्यांहून अधिक आहे. समष्टीची इच्छाशक्ती जेवढी अधिक असते, तेवढे ईश्वर समष्टी प्रारब्ध भोगण्यास किंवा ते नष्ट करण्यास समष्टीला साहाय्य करतो. बिंब-प्रतिबिंब न्यायाप्रमाणे समष्टीच्या तळमळीमुळे ईश्वर आध्यात्मिक बळ देऊन दहावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ करवून घेत आहे. यामुळे दहावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे वातावरण एखाद्या आध्यात्मिक सोहळ्याप्रमाणे जाणवते. दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या माध्यमातून झालेली समष्टी इच्छाशक्तीची जागृती हा स्थुलातील धर्मराज्य संस्थापनेचा पहिला चरण होय. यामुळे ‘हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होणे, हिंदूंना विविध चळवळींत यश मिळणे’, असे पालट भविष्यात बघायला मिळणार आहेत.

२. दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तील प्रथम दिवसाच्या विविध सत्रांचे सूक्ष्मातील परीक्षण

२ अ. उद्घाटन सत्र (दीपप्रज्वलन, वेदमंत्रपठण, संत-सन्मान आणि ग्रंथ लोकार्पण)

१. उद्घाटन सत्राला आरंभ होण्यापूर्वी वातावरणात पुष्कळ दाब जाणवत होता. पाताळातील वाईट शक्ती सूक्ष्म धूर आणि विषारी वायू सोडून वायूमंडलाला त्रासदायक (काळ्या) शक्तीने भारित करत होत्या. यामुळे वायूमंडलात वावरणारे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या मनावरील ताण, तसेच अनावश्यक आणि नकारात्मक विचार यांमध्ये वाढ झाली होती.

२. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक, तसेच सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता पू. हरि शंकर जैन, ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंद महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, तसेच सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संतांनी केलेल्या दीपप्रज्वलनामुळे वातावरणातील दाब न्यून होऊन तेजतत्त्व कार्यरत झाले. या वेळी पूर्ण अधिवेशनस्थळी पांढरा, निळा आणि लाल सूक्ष्म प्रकाश कार्यरत झाला होता. पांढरा प्रकाश निर्गुण तत्त्वाचे, निळा प्रकाश तारक शक्तीचे आणि लाल प्रकाश मारक शक्तीचे प्रतीक होते. या सूक्ष्म प्रकाशामुळे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या मनावरील ताण न्यून होत होता, तसेच त्यांचे पाताळातील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होत होते. दीपप्रज्वलनानंतर सभागृहात दीर्घकाळ तेजतत्त्व कार्यरत होते.

३. व्यासपिठावर उपस्थित पू. हरि शंकर जैन, स्वामी संयुक्तानंद महाराज, निर्गुणानंद महाराज आणि सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज, या संतांचे सन्मान होतांना अधिवेशनस्थळी वायुतत्त्व कार्यरत झाले होते. या वायुतत्त्वामुळे संतांकडे येणारे ईश्वरी शक्तीचे प्रवाह (ओघ) आणि त्यांच्याकडून समष्टीत प्रक्षेपित होणारे चैतन्य, यांमध्ये वाढ झाल्याने वायूमंडल अधिक सात्त्विक झाले होते.

४. व्यासपिठावर उपस्थित पू. हरि शंकर जैन, स्वामी संयुक्तानंद महाराज, निर्गुणानंद महाराज, तसेच सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज या संतांच्या करकमलांनी हिंदी भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्था पर नया आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी तेजतत्त्व कार्यरत असल्याचे लक्षात आले. ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वी ग्रंथाभोवती लाल रंगाचे मारक शक्तीचे वलय असून त्यात सुप्त तेजतत्त्व कार्यरत होते. संतांच्या हस्ते प्रकाशन झाल्यावर ग्रंथातील सुप्त तेजतत्त्व जागृत झाले. त्यामुळे ग्रंथाभोवती असलेल्या मारक शक्तीच्या प्रभावळीत वाढ होऊन त्यातून लाल रंगाचे किरण प्रक्षेपित होत होते. ग्रंथातून प्रक्षेपित मारक शक्तीचा परिणाम भुवर्लाेकापासून चौथ्या पाताळातील वाईट शक्तींवर होत होता.

५. अखिल ‘भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त प्रथम कोरोना महामारीच्या काळात मृत झालेले अनेक साधक, हिंदुत्वनिष्ठ, अर्पणदाते आणि हितचिंतक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजलीच्या अंतर्गत सनातन पुरोहित वेदपाठशाळेचे ब्रह्मवृंद श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी श्री दत्तात्रेय यांचा श्लोक म्हटला. व्यासपिठावर श्लोकाचे उच्चारण होतांना विशाल स्वरूपातील श्री दत्तात्रेय यांचे दर्शन होऊन ‘ते अनेक सात्त्विक लिंगदेहांना साधना करण्यासाठी शक्ती प्रदान करत आहेत’, असे दिसले.

२ आ. दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी वाचन करणे

१. सद्गुरु सत्यवान कदम संदेशाचे वाचन करत असतांना त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन होत होते. ‘सद्गुरु सत्यवान कदम सतत उच्च शिष्यभावात असतात. संदेशवाचन करतांनाही ते अंतरंगातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असून काही अंशी त्यांच्याशी एकरूप झाल्याने ‘त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसत आहेत’, असे लक्षात आले.

२. सद्गुरु सत्यवान कदम संदेशाचे वाचन करत असतांना त्यांचे शब्द एका पोकळीतून येत असल्याचे सूक्ष्मातून जाणवत होते. या संदर्भात मला जाणवले, ‘दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला संदेश स्थळ आणि काळ यांच्या पलीकडील, म्हणजे ‘ब्रह्मा’शी संबंधित आहे. यालाच ‘ब्रह्मवाणी’, असेही म्हणतात. ‘ब्रह्मवाणी’ ही आकाशतत्त्वाशी निगडित असते. त्यामुळे सूक्ष्मातून एका पोकळीतून शब्द येतांना जाणवत आहेत.’

३. सद्गुरु सत्यवान कदम संदेशाचे वाचन करत असतांना वातावरणात प्रथम ‘फिकट पिवळा, मग निळा आणि शेवटी मंद हिरवा’, हे रंग कार्यरत झाले. या संदर्भात माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश म्हणजे ज्ञानशक्ती. ज्ञानशक्तीचा रंग पिवळा असतो. ‘अधिवेशनात सहभागी ज्ञान, क्रिया आणि इच्छा या तिन्ही स्तरांवरील जिवांना ‘ते ग्रहण करू शकतील, अशी त्या त्या स्तरावरील शक्ती मिळाली’, असा याचा अर्थ आहे.’

४. सद्गुरु सत्यवान कदम परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करत असतांना व्यासपिठावर अन्य कोणाचेही अस्तित्व न जाणवता केवळ भगवान श्रीकृष्णाचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवत होते. ‘महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने धर्मगुरूच्या रूपात गीतेतील शाश्वत ज्ञान सांगून अन्यायाविरुद्ध योग्य मार्गाने लढण्याची प्रेरणा दिली. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवलेही धर्मगुरु होऊन प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाला साधनेचे महत्त्व सांगून साधना म्हणून दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध योग्य मार्गाने लढण्याची प्रेरणा देत आहेत’, असे जाणवले.

५. सद्गुरु सत्यवान कदम संदेशाचे वाचन करत असतांना ते ‘निर्गुण स्थिती’त असल्याचे जाणवत होते.

२ इ. दहाव्या अखिल ‘भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या आरंभीचे भाषण करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

२ इ १. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या वाणीतून प्रक्षेपित धर्मतेजामुळे (ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या सुरेख संगमामुळे) ध्यान लागणे : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी बोलणे चालू केल्यावर माझे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे न जाता माझे ध्यान लागत होते. काही वेळाने ध्यानावस्था न्यून झाल्यावर मी ध्यान लागण्याचे कारण शोधले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘ज्या वेळी संतांची ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांची साधना पूर्ण होऊन ते निर्गुणाकडे वाटचाल करतात, त्या वेळी त्यांच्या वाणीत ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचा सुरेख संगम होतो. ‘ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या सुरेख संगमालाच ‘धर्मतेज’, असे म्हणतात. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची ‘धर्मगुरु’पदाकडे वाटचाल होत असल्याने त्यांच्यात असे पालट होत आहेत.’

२ इ २. वक्तव्याच्या आरंभी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे रूप निर्गुण तत्त्वामुळे धूसर, तर नंतर समष्टी गुरु स्वरूपातील कार्यामुळे त्यांचे रूप सुस्पष्ट दिसणे : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी बोलणे चालू केल्यावर सूक्ष्मातून त्यांचे रूप धूसर दिसत असून देहाची केवळ कडा दिसत होती. ते धूसर दिसत असतांनाही त्यांच्याकडे बघून आनंद होत होता. ते बोलत असतांना काही वेळाने हळूहळू त्यांचे रूप सुस्पष्ट होऊन त्यांचे डोळे पाणीदार आणि ओठ गुलाबी दिसू लागले. या संदर्भात माझ्या लक्षात आले, ‘व्यष्टी स्तरावरील साधनेमुळे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे निर्गुणाकडे जात असल्याने त्यांचे रूप सूक्ष्मातून धूसर दिसते. ते निर्गुणात जात असल्याने त्यांच्या रूपाकडे बघून आनंद होतो. असे असले, तरी ते समष्टी गुरु असल्याने ते पूर्णपणे निर्गुणात न जाता तेथून आध्यात्मिक बळ घेऊन समष्टीला मार्गदर्शन करण्यासाठी सगुणात येतात. या प्रकारे सगुणात आल्यावर त्यांच्यातील तेज आणि ‘आतापर्यंत झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’चे सूक्ष्म स्तरीय परिणाम महर्लाेकापासून पाचव्या पाताळापर्यंत मर्यादित होते. काळानुसार समष्टीची वाटचाल रामराज्याकडे (हिंदु राष्ट्राकडे) होत आहेआकाश या तत्त्वांमध्ये वाढ होते. त्यामुळे त्यांचे डोळे पाणीदार आणि ओठ गुलाबी दिसतात.’

२ इ ३. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यातील आकाशतत्त्व कार्यरत झाल्याने त्यांनी केलेल्या भाषणातून उपस्थितांना आध्यात्मिक लाभ होणे आणि समष्टी हिंदु शक्तीच्या जागृतीसाठी ‘शक्तीपात’ होणे : सद्गुरु डॉ. पिंगळे दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे बीजवक्तव्य मांडत असतांना मला त्यांचे रूप मोठे मोठे होतांना दिसत होते. यातून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यात आकाशतत्त्व कार्यरत असल्याचे माझ्या लक्षात आले. आकाशतत्त्व सर्वव्यापक आणि काळानुसार कार्य करणारे असते. यामुळे सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यात कार्यरत आकाशतत्त्वामुळे उपस्थित सर्वच हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना आध्यात्मिक लाभ होत होते. याच प्रकारे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य समष्टीत जाऊन ‘शक्तीपाता’सारखे कार्य करून हिंदूंच्या मनात अन्यायाच्या विरोधात जागृती करत होते.

२ इ ४. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या मार्गदर्शनापूर्वी अधिवेशनस्थळी तेजतत्त्व कार्यरत होते, तर त्यांच्या वक्तव्यानंतर आकाशतत्त्व कार्यरत झाले.

२ ई. ‘राष्ट्रीय कार्य आणि घटनात्मक सुधारणा ’, या प्रबोधन सत्राचे सूक्ष्मातील परीक्षण

२ ई १. वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून समष्टीचे रक्षण करण्यासाठी वायूमंडलात मारक तेजतत्त्व कार्यरत असल्याने सूक्ष्मातून सर्वत्र लाल रंग पसरलेला दिसणे : ‘राष्ट्रीय कार्य आणि घटनात्मक सुधारणा’, या प्रबोधन सत्राच्या कालावधीत वायूमंडलात ४ थ्या आणि ५ व्या पाताळातील वाईट शक्ती आक्रमण करत होत्या. यामुळे त्यांच्या आक्रमणांपासून समष्टीचे रक्षण करण्यासाठी पूर्ण कालावधी मारक तेजतत्त्व वायूमंडलात कार्यरत होते. यामुळे या सत्रात सूक्ष्मातून सर्वत्र लाल रंग पसरलेला दिसत होता.

२ ई २. अधिवक्ता विष्णु शंकर जैन (प्रवक्ता, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस, तसेच अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय) यांच्या भावामुळे अधिवेशनस्थळी आकाशतत्त्वात वाढ होणे आणि ते टिकून रहाणे : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या भाषणानंतर अधिवेशनस्थळी आकाशतत्त्व कार्यरत झाले होते. पुढे काही काळाने ते न्यून होणे चालू झाले होते. प्रबोधन सत्राच्या अंतर्गत ‘प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ची भीषणता आणि काशी-मथुरा मुक्ती आंदोलन’ या विषयावर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे प्रबोधन करणारे भाषण होते. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी त्यांचे विषय मांडणे चालू केल्यावर प्रथम काही काळ सूक्ष्म गंध आला, मग भाव जागृत झाला आणि त्यानंतर सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागला, म्हणजे अनुक्रमे पृथ्वीतत्त्व, भाव आणि आकाशतत्त्व कार्यरत होण्याची अनुभूती आली. या संदर्भात लक्षात आले, ‘अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यात भाव पुष्कळ आहे. व्यष्टी भावाला परिपूर्ण कर्माची जोड देऊन ते समष्टी साधना करत आहेत. अशा प्रकारच्या साधनेला ‘कर्मयज्ञ (यज्ञासमान फळ देणारी कर्मस्वरूप साधना)’ म्हणतात. अशा साधनेमुळे त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे, तसेच त्यांचा प्रवास (प्रकट) भावातून भक्तीकडे होत आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे अधिवेशनस्थळाच्या वायूमंडलातील आकाशतत्त्व न्यून न होता त्यात वाढ झाली, तसेच ते दीर्घकाळ टिकून राहिले. यातून भाव आणि कर्म यांचे महत्त्व लक्षात आले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२२, दुपारी ३.४०)

  • सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक