VIDEO : मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

रामनाथी – मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्त्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे. अनेक मंदिरांमध्ये महाआरती होत आहे. आता आपण मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवा. मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळही वाढेल. मंदिरे टिकली, तरच धर्म टिकेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. त्यांनी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आयोजित केलेल्या दुसर्‍या सत्रात ‘मंदिर विश्‍वस्त आणि पुजारी यांना संघटित करणे’, या विषयावर अनुभव कथन केले.

ग्रामरक्षादल स्थापन करून राष्ट्र आणि धर्म रक्षणाची भावना युवकांमध्ये निर्माण करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजाजगृती समिती

प्रशांत जुवेकर

सद्य:स्थितीत हिंदूंना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे रणनीती निश्‍चित करून हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायला हवे. यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षादल स्थापन करून युवक-युवती यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. गावातील सर्व युवक-युवती यांना स्वरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे. गावावर कोणते संकट आल्यास ग्रामरक्षादल स्वत:सह गावाचे रक्षण करेल. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. मंदिरे ही हिंदूंची शक्तीस्थाने आहेत. ‘धर्मांध प्रथम मंदिरांवर आक्रमण करतात’, हे लक्षात घेऊन मंदिरांच्या रक्षणाचे नियोजनही ग्रामरक्षादलाने करायला हवे. ‘मी हिंदु आहे आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे’, ही भावना युवक-युवती यांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ‘ग्रामरक्षादलाच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.