परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची लक्षात आणून दिलेली अहंशून्यता !

पूर्वी एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौऱ्यावर जाणारे एक साधक रामनाथी येथील आश्रमात आले होते. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्या दोघांमध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी पुढील संभाषण झाले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
सौ. रंजना गडेकर

एक साधक : आम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह दैवी दौरा करतो. तेव्हा साधक त्यांना भेटल्यावर सांगतात, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळाल्यावर ‘तुमच्याविषयीचे लेख आधी वाचूया’, असे आम्हाला वाटते. आम्ही तुमच्या दैवी दौऱ्याविषयीचे लेख वाचतो आणि तुमचा प्रवास चांगला होण्यासाठी प्रार्थना करतो.’ ते ऐकून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दौऱ्यांतील साधकांना सांगतात, ‘‘संतांचे आशीर्वाद आणि साधक करत असलेल्या प्रार्थना यांमुळेच आपला दौरा चांगला होतो. साधकांच्या प्रार्थनारूपी ऊर्जेमुळेच आपला प्रवास चांगला होण्यास साहाय्य होते.’’

परात्पर गुरु डॉक्टर : त्यांच्यामध्ये अहं किती अल्प आहे ना ! त्या स्वतः सद्गुरुपदी असूनही त्यांना ‘माझ्यामुळे दौरा चांगला होतो’, असे वाटत नाही, तर ‘साधकांमुळे होतो’, असे वाटते !

परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी काढलेले वरील उद्गार किती कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहेत ! त्यांनी श्रीविष्णुस्वरूप श्री गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मन जिंकल्यामुळे महर्षीही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे कौतुक करतात. ‘त्यांचा संत, साधक आणि समाजातील लोक यांच्याप्रती किती भाव आहे ?’, हे त्यांच्या या सहज बोलण्यावरून लक्षात येते.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१९)