पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक

सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत

हरिद्वार (उत्तराखंड) – संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर येत्या १० ते १५ वर्षांत अखंड भारत होईल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. डॉ. मोहन भागवत यांच्या हरिद्वार दौर्‍यात काही संतांनी त्यांच्याकडे देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली.

सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१.  हिंदु राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षांत पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल.

२. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल. आमच्या मनात द्वेष नाही; पण जग शक्तीला मानते, मग काय करणार ?

३. सनातन धर्माचा विरोध करणार्‍यांचेही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता, तर हिंदू जागा झाला नसता. तो झोपूनच राहिला असता.

४. धर्माचे उत्थान झाले, तरच भारताचे उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील.

मोहन भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक झाले पाहिजे ! – संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत

मोहन भागवत यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले की, अखंड भारताचे कुणी स्वप्न पहात असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करू. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे, त्याचे कौतुक झाले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने याच सूत्रावर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान कह्यात घ्या अन् अखंड भारत निर्माण करा. तुम्हाला कुणी थांबवलेले नाही. अखंड भारत निश्‍चित करा; पण आधी काश्मिरी हिंदूंची घरवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या.