सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

पूर्वज, तसेच होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

समारोपप्रसंगी डावीकडून पू. (कु.) दीपाली मतकर, सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये

आज जवळपास प्रत्येकाला व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर त्रास होत आहे. विवाह झाला तरी लवकर मुलं न होणे, विविध शारीरिक त्रास, घरातील अनेक अडचणी यांना सामोरे जावे लागते. यातील अनेक त्रास हे पूर्वज, तसेच वाईट शक्तींच्या त्रासामुळे होतात. तरी पूर्वजांमुळे होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले, त्या सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात बोलत होत्या.

दुसर्‍या दिवशी प्रथम सत्रात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सौ. सुनीता पंचाक्षरी यांनी ‘हिंदु राष्ट्र संघटकाची आदर्श आचारसंहिता’ याविषयी मार्गदर्शन केले. जेव्हा आपण समाजात प्रसारासाठी जातो, तेव्हा आपले वर्तन आदर्शच हवे. जिथे जिथे आपण संपर्कासाठी जाऊ तिथे तिथे त्यांच्यात एकत्र मिसळून धर्मबंधुत्वाचे घट्ट नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे श्री. मनोज खाडये यांनी सांगितले.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातून अनमोल सूत्रे

भारताला समृद्धी मिळवून देणारी पितृशाही पद्धत आवश्यक !

सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये

१. पूर्वीच्या काळी जो सक्षम आहे तो राज्यकर्ता होत असे. राजेशाही व्यवस्थेत राजा प्रजेची काळजी घ्यायचा. पूर्वी भारतात पितृशाही असल्यामुळे समृद्धी होती. याउलट सध्या जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांना निवडून येण्यासाठी कसल्याही प्रकारचा निकष नाही.

२. पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धती होती. त्या शिक्षणपद्धतीत उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, तसेच अन्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. याउलट आजच्या लोकशाही व्यवस्थेत ज्यांच्याकडे पैसा आहे तोच केवळ चांगल्या प्रतीचे, तसेच उच्च शिक्षण घेऊ शकतो, अशी स्थिती आहे.

३. सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत ज्या व्यक्तीला राज्यकारभार चालवण्याची कसलीही माहिती नाही, प्रशासकीय व्यवस्थेचा कसलाही अनुभव नाही अशी व्यक्ती एका राज्याची मुख्यमंत्री होते, त्याचसमवेत ज्यांना संरक्षण-अर्थ अशा विभागांचे ज्ञान नाही आणि जे ४ थी पास किंवा अल्पशिक्षित आहेत, असेही त्या विभागांचे मंत्रीपद सांभाळतो.

४. बहुतांश शासनकर्ते जनतेला लुटण्याचे काम करतात. आजच्या राज्यव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रांत भ्रष्टाचार असून त्याविरोधात आपणही आपल्या परीने आवाज उठवला पाहिजे. त्या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा कसा द्यावा, या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी धर्मप्रेमी श्री. बलभीम देवकर (डावीकडे) आणि श्री. सुजल मुशन आणि सौ. पल्लवी राऊत (उजवीकडे) यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नांविषयी व्यासपिठावर बोलावून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

अन्य घडामोडी

दुसर्‍या दिवशी द्वितीय सत्रात अनेक धर्मप्रेमींनी त्यांना दिलेले विविध विषय व्यासपिठावर येऊन अभ्यासपूर्ण मांडले. या वेळी श्री. दुर्गानाथ देशमुख या धर्मप्रेमींनी ‘ना मुझे दौलत चाहिए, ना नाम चाहिए मुझे, मुझे तो बस विश्व मे हिंदु राष्ट्र चाहिए’, असे विषय मांडतांना सांगितले.

समारोपप्रसंगी म्हैसगाव, बार्शी येथील धर्मप्रेमी श्री. शिवाजी पवार यांनी कविता सादर केली.

उठा हिंदूंनो उठा जागृत व्हा !

उठा हिंदूंनो उठा ! जागृत व्हा !
नाहीतर हिंदुस्थान मृत होईल ।।१।।

धर्मावर घाव घालणार्‍या राक्षसांना चिरडा, नाहीतर धर्म आपला नष्ट होईल ।
जागा हो अस्तित्वसाठी संघर्ष कर ।।२।।

छत्रपतींना आठवा नाही, तर स्वराज्य आपले नष्ट होईल ।
अरे स्मरण कर त्या शूरविरांना लढा त्यांचा अंगी घे ।।३।।

नाहीतर इतिहास आपला मृत होईल ।
धर्मरक्षणासाठी हिंदु जनजागृती समिती आहे ।।४।।

ये इथे जाण, श्रेष्ठत्व आपल्या धर्माचे ।
नाहीतर आत्मा आपला मृत होईल ।।५।।

उठा हिंदूंनो, उठा जागृत व्हा ।
नाही तरी हिंदुस्थान मृत होईल ।।६।।