भारतीय पंचांगामध्ये एक वर्षापूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी !

  • रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध

  • मकर राशीमधील शनीच्या प्रवेशामुळे होते उलथापालथ !

भारतीय ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचा आधार घेऊन भारतीय शासनकर्त्यांनी राज्य कारभार केला, तर भारत अनेक समस्यांना सामोरे जाण्यास आधीच सिद्ध होऊ शकतो ! – संपादक
भारतीय पंचांगामधील युद्धाची भविष्यवाणी

नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू झालेल्या युद्धाची भविष्यवाणी भारतीय पंचांगाद्वारे एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. ज्योतिषाचार्य पंडित मुकेश मिश्र यांनी या युद्धामागे ‘अंगारक योग’ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या वेळी विक्रम संवत २०७८ च्या अंतर्गत ‘आनंद’ नावाचे संवत्सर चालू आहे. या संवत्सराचा प्रारंभ मंगळवारी झाला होता. या संवत्सराचा राजा आणि मंत्री हा मंगळ ग्रह आहे. मंगळाला ज्योतिषशास्त्रामध्ये ‘युद्धकारक ग्रह’ मानले जाते. सध्या शनि ग्रह मकर राशीमध्ये आहे. २६ फेब्रुवारीला यामध्ये मंगळानेही प्रवेश केला आहे. या दोघांची युती झाली आहे. त्यातून ‘अंगारक योग’ निर्माण झाला आहे. हा योग ७ एप्रिलपर्यंत असणार आहे. या योगामुळे युद्ध, भूकंप किंवा सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होते किंवा वाढते. अराजकासह, हिंसा, रक्तपात किंवा नैसर्गिक संकटांमध्ये वाढ होते. पंचांगामध्ये याच ‘अंगारक योगा’वरून  म्हटले होते की, युरोपमध्ये युद्धाची स्थिती निर्माण होईल.

ज्योतिषाचार्य मिश्र यांनी पुढे सांगितले की, ग्रह जेव्हा त्यांचे स्थान पालटतात, तेव्हा त्यांचा प्रभाव त्याच्या २-३ दिवस आधी दिसू लागतो. म्हणून २६ फेब्रुवारीला मंगळाने मकर राशीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच म्हणजे २३ फेब्रुवारीच्या रात्री रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला प्रारंभ झाला.

भारत ‘जागतिक शक्ती’ म्हणून उदयास येणार !

ज्योतिषाचार्य पंडित मुकेश मिश्र यांनी सांगितले की, पंचांगानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे येणारा काळ तणावपूर्ण असला ,तरी भारताची स्थिती भक्कम असणार आहे. ग्रहांचे पालन भारताच्या बाजूने आहेत. यामुळे भारत एक ‘जागतिक शक्ती’ म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येईल. मकर राशीतील शनि ग्रह नेहमीच कष्टदायक असतो. भारताच्या संदर्भात हा त्रासदायकच ठरतो. जागतिक स्तरावर यामुळे युद्ध, अराजकासह महागाईमध्येही वाढ होते. अशी स्थिती वर्ष १९६२ आणि वर्ष १९९२-९३ मध्ये निर्माण झाली होती. वर्ष २०२० मध्ये शनि ग्रह मकर राशीत प्रवेश करतांना भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता.