५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कसाल, जिल्हा सिंधुदुर्ग येथील चि. चैतन्य परेश साटम (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. चैतन्य परेश साटम हा या पिढीतील एक आहे !

मूळचा मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथील आणि आता कसाल (सिंधुदुर्ग) येथील चि. चैतन्य परेश साटम याची आई आणि कुटुंबीय यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘वर्ष २०१८ मध्ये ‘चि. चैतन्य परेश साटम उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५६ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५८ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
चि. चैतन्य साटम

सौ. रेश्मा परेश साटम (चि. चैतन्यची आई), कसाल, जिल्हा सिंधुदुर्ग.

सौ. रेश्मा साटम

१. बालसंस्कारवर्गात ‘काटकसर’ या गुणाच्या संदर्भात ऐकल्यावर लगेच तशी कृती करणे

‘एकदा सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात ‘काटकसर’ या गुणाच्या संदर्भात गोष्ट सांगण्यात आली. चि. चैतन्यने ती लक्षपूर्वक ऐकली. नंतर मी घरकाम करत असतांना चैतन्यने मला सांगितले, ‘‘पाणी जपून वापर. वाया घालवू नकोस.’’

२. देवाची ओढ

आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी गावातील मंदिरात गेलो असतांना चैतन्यच्या समवेत त्याचे बालमित्रही मंदिरात आले होते. आम्ही मंदिरात शिवपिंडी आणि अन्य देवतांच्या मूर्ती यांना नमस्कार केल्यावर मी सर्व मुलांना नामजप करायला सांगितला. सर्व मुले मस्ती करत होती; मात्र चैतन्य शांतपणे नामजप करत होता. चैतन्यचा एक मित्र चैतन्यशी सतत मस्ती करत होता, तरीही चैतन्यने नामजप करायचे थांबवले नाही. मंदिरातून निघतांना त्याने सर्व देवांना साष्टांग नमस्कार केला.’

सौ. प्रभा साटम (चि. चैतन्यची आजी, वडिलांची आई), कसाल, जिल्हा सिंधुदुर्ग.

सौ. प्रभा साटम

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

‘२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा होता. मी त्या दिवशी प्रसाद बनवत होते. त्या वेळी चैतन्य ‘‘आजी, मी काय सेवा करू ? मी काही साहाय्य करू का ?’’, असे सतत मला विचारत होता आणि त्या दिवशी तो देवघरातील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला वारंवार साष्टांग नमस्कार करत होता.

२. वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चैतन्यची भावस्थिती

२३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या दिवशी आम्ही परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र एका वेगळ्या पटलावर ठेवून त्याची पूजा केली होती. चैतन्य त्या छायाचित्राकडे पाहून प्रदक्षिणा घालत होता. मी ‘बस रहे मनमें कृतज्ञता’ हे गीत म्हणत असतांना तो हात जोडून ‘कृतज्ञता, कृतज्ञता’, असे म्हणत होता. त्या दिवशी मी त्याला ‘‘आपल्याकडे कोण आले होते ?’’, असे विचारले, तर तो ‘कृष्णबाप्पा’ असे सांगत होता. त्या दिवशी तो सकाळी अंघोळ केल्यापासून सतत भावस्थितीत होता.’

सौ. मैत्रेयी भूषण कुलकर्णी (चि. चैतन्यची आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. मैत्रेयी कुलकर्णी

१. इतरांना साहाय्य करणे

‘एक दिवस मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. त्या वेळी त्याने ‘‘आत्या, तू बस’’, असे सांगून माझा हात धरून मला आसंदीत बसवले. कुणालाही त्रास होत असल्याचे चैतन्यला जाणवल्यास तो त्यांना साहाय्य करतो.

२. चुकांविषयी संवेदनशील

चैतन्यला त्याच्या चुका सांगायला सांगितल्यावर तो त्याच्याकडून झालेल्या चुका सांगतो. त्याच्याकडून चूक झाल्यास तो स्वतःहून कान पकडून क्षमा मागतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १२.११.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक