‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. डॅमिएन मिशेल यांना साधना करण्याचा निर्णय घेतांना ईश्वरी कृपेने आलेली अनुभूती

१. ‘साधना आणि व्यवहार यांच्या निवडीविषयी सद्गुरु सिरियाक वाले यांनी मार्गदर्शन करावे’, असे वाटणे

‘माझा साधना आणि व्यवहार यांच्या निवडीविषयी निर्णय घेतांना संघर्ष होत होता. त्यामुळे ‘सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून याविषयी मार्गदर्शन मिळणे’, हा मला सोपा मार्ग वाटत होता. मी सद्गुरु सिरियाक वाले यांच्या सत्संगाला जातांना एकदा माझ्या मनात अयोग्य विचार आला, ‘आज सद्गुरु सिरियाकदादा मला ‘व्यवसायाच्या मागे धावणे सोडून ईश्वराला शरण जा अन् ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधना चालू ठेवा’, असे सांगतील.’ सत्संग संपला, तरी मला जे मार्गदर्शन त्यांच्याकडून अपेक्षित होते, ते न मिळाल्याने मी निराश झालो. नंतरचे दोन दिवस मी पुष्कळ निराशेत होतो. ‘कोणता मार्ग निवडावा ?’, हे मला समजत नव्हते. मला ‘सद्गुरूंकडून या संदर्भात काही मार्गदर्शन मिळत नसेल, तर याविषयी आशा बाळगण्यात काही अर्थ नाही’, असा मी विचार केला.

२. ‘साधना अथवा व्यवसाय यांपैकी एक सोडावे लागणार आहे’, हे लक्षात येणे

माझ्या जीवनात मी कुटुंब, साधना आणि व्यवसाय यांना प्राधान्य दिले होते; पण या तिघांच्या अपेक्षांची पूर्तता करणे मला अशक्य होत होते. त्यामुळे मी पत्नी आणि मुले यांपासून दुरावत चाललो होतो. मला साधनेतील ध्येय पूर्ण करणे जमत नव्हते आणि त्याविषयी अभ्यास करण्यासाठीही मला वेळ देता येत नव्हता. या स्थितीत ‘मला साधना अथवा व्यवसाय यांपैकी एक सोडावे लागणार आहे’, हे माझ्या लक्षात आले.

३. ‘साधना सोडून व्यवसायाकडे लक्ष द्यावे’, असा निर्णय घेणे; परंतु नंतर ‘व्यावसायिक कारकिर्दीच्या मागे न जाता देवाच्या इच्छेपुढे शरण जायला हवे’, याची जाणीव होणे

शेवटी मी ‘काही वर्षे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधना करणे सोडून स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे’, या निर्णयाप्रत येऊन पोचलो. त्यानंतर ‘मी ईश्वराला संपूर्ण शरण गेलो आहे’, अशी मला अनुभूती आली. मी स्वयंपाकघरात उभा असतांना मला ‘माझा सूक्ष्म देह ईश्वरासमोर भूमीवर गुडघे टेकून नमस्काराच्या मुद्रेत बसला असून तो मस्तक झुकवून संपूर्णपणे ईश्वराला शरण गेला आहे’, असे दृश्य दिसले. असे मी यापूर्वी कधी अनुभवले नव्हते. या अद्भुत अनुभूतीमुळे मला ‘माझ्या मनातील व्यावसायिक कारकिर्दीच्या मागे न जाता देवाच्या इच्छेपुढे शरण जायला हवे’, याची जाणीव झाली.

४. देवाला कोणीतरी सांगितले; म्हणून नव्हे, तर साधनेचा निर्णय स्वतः घेणे अपेक्षित असल्याचे लक्षात येणे

देवाने मला ‘सद्गुरु सिरियाकदादांचा सत्संग का मिळवून दिला ?’, हे माझ्या लक्षात आले. देवाला माझ्या मनातील ‘पुढे काय करावे ?’, याविषयी कुणाचे तरी मार्गदर्शन मिळावे’, ही इच्छा ज्ञात होती. केवळ ‘सद्गुरु सिरियाकदादाच मला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात’, यावर माझा विश्वास असल्याने त्याने मला त्यांचा सत्संग मिळवून दिला. प्रत्यक्षात सद्गुरु दादांकडून काहीच मार्गदर्शन न मिळाल्याने आलेल्या घोर निराशेने मला अंतर्मुख केले. देवाला मी ईश्वरप्राप्तीचाच मार्ग निवडावा; मात्र तो सद्गुरु दादांनी सांगितला; म्हणून नव्हे, तर मला ईश्वरप्राप्तीची तळमळ आहे; म्हणून निवडणे अपेक्षित होते. त्यामुळेच मी देवाला संपूर्णपणे शरण जाऊ शकलो.

ही अनुभूती येण्यापूर्वी मला शरणागतभावाने प्रार्थना करता येत नव्हती. आता मी कोणत्याही संघर्षाविना अंतःकरणपूर्वक देवाला संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करतो.

ईश्वरचरणी कृतज्ञता !’

– श्री. डॅमिएन मिशेल, आयर्लंड (४.९.२०१८)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक