वारकर्‍यांनो, धर्मावरील आघात रोखण्यासाठी सक्षम कायदा करण्याची शासनकर्त्यांकडे मागणी करा !

साहित्य परिषदेच्या निमित्ताने ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांचे वारकर्‍यांना आवाहन

ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ जानेवारी (वार्ता.) – संत, देवता, हिंदु धर्मातील ग्रंथ आदींवर सातत्याने आघात होत असतात. गावोगावी मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू आहे. गोहत्यांचे प्रमाण वाढले आहे. देवतांचे विडंबन होत आहे. वारकर्‍यांना पैशांचा लोभ दाखवून मंत्र्यांच्या उपस्थितीत वारकरी परिषद भरवल्या जात आहेत. पाकिस्तानमध्ये ईश निंदेला फाशीची शिक्षा आहे. याच धर्तीवर संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सक्षम कायद्याची मागणी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करा, असे आवाहन ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे साहित्य परिषदेच्या निमित्ताने वारकर्‍यांना केले आहे. (हिंदुबहुल भारतात असा कायदा करण्याची मागणी का करावी लागते ? – संपादक)

शाळा महाविद्यालयांतून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अभंग गाथा, संत चरित्र आदींचा अभ्यासक्रमात समावेश करा. पंढरपूर, आळंदी, देहू इत्यादी तीर्थक्षेत्रात मांस आणि मद्य यांच्या विक्रीमुळे पवित्रता नष्ट होत आहे. तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवण्यासाठी या ठिकाणी होत असलेली मद्य आणि मांस यांची विक्री बंद होण्यासाठी मागणी करा.