बिहारमध्ये भाजपच्या मंत्रीपुत्राकडून मुलांना मारहाण करत गोळीबार

गावकर्‍यांनी पाठलाग केल्याने गाडी सोडून पलायन !

भाजपच्या मंत्र्याच्या मुलाकडून असा प्रकार घडणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही. सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी ! – संपादक

वर्तुळात नीरज कुमार उपाख्य बबलू

चंपारण (बिहार) – येथील नौतन मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि बिहारचे पर्यटनमंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा नीरज कुमार उपाख्य बबलू याचे त्याच्या बागेत क्रिकेट खेळत असलेल्या मुलांसमवेत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात बबलू याने मुलांवर गोळीबार केला. या वेळी झालेल्या मारहाणीमध्ये एका लहान मुलासह काही जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेतिया येथील हरदिया फुलवारी गावात ही घटना घडली.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे, ‘बबलू याने आणि त्यांच्यासमवेत असलेल्या लोकांनी मुलांना मारहाण करत गोळीबार केला.’ संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बबलू आणि त्याचे  साथीदार यांचा पाठलाग केला. यामुळे बबलू आणि त्याचे साथीदार परवाना असलेली रायफल, पिस्तुल घेऊन आणि गाडी सोडून पळून गेले. ग्रामस्थांनी बबलू ज्या वाहनातून आला होता ते वाहन कह्यात घेतले. ‘बबलू आणि इतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले नसते, तर परिस्थिती आणखी बिघडू शकली असती’, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.