थोर आणि पावन भरतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा असणे अन् वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले, तरच राष्ट्र टिकेल !

१. भरत भूमीची सहस्रो वर्षांची परंपरा तरुण पिढीत प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील !

‘आमच्या थोर आणि पावन भरत भूमीची सहस्रो वर्षांची परंपरा आपल्या पाठीशी उभी आहे. त्याची लाज कशाकरता ? ही तर आमची तेजःपुंज ज्वलंत अस्मिता आहे. जगाला ही वैशिष्ट्येच शिकवायची आहेत. भारताने नेतृत्व करायचे आहे. ही जी ज्वलंत आणि जहाल अस्मिता आहे, तीच आमच्या तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल अन् सत्त्व विकसित करील.

२. स्वातंत्र्यानंतर आंग्लाळलेला वर्ग सत्ताधारी झाल्यामुळे मूळ आदर्श आणि मानदंड छिन्न-भिन्न होणे

भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा पाश्चात्त्य संस्कृतीने नखशिखांत ग्रासलेल्या एका भारतीय वर्गाच्या म्हणजे आंग्लाळलेल्या पाश्चात्त्यांचे बूट चाटणार्‍यांच्या हाती निर्णय आणि सत्ता आली. ब्रिटीश राजवटीने जी भारताची राज्यव्यवस्था आणि शासन सिद्ध केले, त्याच्या चौकटीतूनच हा आंग्लाळलेला वर्ग सत्ताधारी बनला. त्यामुळे त्याने आमचे मूळ आदर्श आणि मानदंड छिन्न-भिन्न केले.

३. ‘आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, हे हिंदूंना शिकवणे आवश्यक !

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल; पण आपण ते कसे मान्य कराल ? पुरोगाम्यांच्या आणि नेहरूवाद्यांच्या राजकीय संघटना अन् त्यांचे कार्य केवळ सत्तेकरता आणि स्वार्थाकरता आहे. सत्ता हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताची समाजरचना अभ्यासली गेली का ? प्राचीन समाज रचनाशास्त्रांचा हिंदु समाजाला भक्कम आधार आहे. त्याची उपेक्षा करू नका. कमरेचे कापड डोक्याला गुंडाळू नका. आतातरी हिंदूंनी अंतर्मुख होऊन विचार करावा. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठातील (‘युनिव्हर्सिटी’तील) पाठ्यपुस्तके आणि अभ्यास पुस्तकांतून ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हद्दपार करून ‘आर्य हेच या भूमीचे अधिपति, ते इथलेच, आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत मांडला, शिकवला आणि सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे. अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !

४. पाश्चात्त्य शिक्षणाने आम्ही पुरुष श्रद्धाहीन झालोच आहोत. आमच्या धर्मपरंपरा, रितीरिवाज आणि कुलाचारादि परंपरा अशा प्रत्येक आचाराविषयी संशय अन् अश्रद्धा हा आमचा स्वभाव झाला आहे. राष्ट्रीय धन असलेल्या स्त्रियांमध्ये सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील त्यांची नितांत निष्ठा टिकवून ठेवायला हवी !

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२१)