गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

तृणमूल काँग्रेस आणि ‘मगोप’ यांच्या युतीची अधिकृत घोषणा

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ झाला आहे आणि आता देशभर भाजपची अशीच स्थिती होणार आहे, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. तृणमूल काँग्रेसची ‘मगोप’ समवेत युती झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर पणजी येथे आयोजित एका संयुक्त सभेत बोलतांना मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी असे वक्तव्य केले. या सभेला ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘‘भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ निवडणुकीच्या वेळीच गंगा आठवते आणि मते मिळवण्यासाठीच ते गंगेत उडी घेऊन स्नान करतात. गंगेला आम्ही ‘आई’ मानतोे; मात्र उत्तरप्रदेश येथील भाजपप्रणित सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्याचे शव संबंधित कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दर्शवल्याने ते गंगेत टाकून ती अपवित्र केली. मी ब्राह्मण आहे आणि मला भाजपच्या चारित्र्य दाखल्याची आवश्यकता नाही.’’ ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गोव्यात अफवा पसरवल्या जात आहेत. बंगालमध्ये निर्वासितांना वर्ष १९७२ मध्ये आश्रय मिळाला होता आणि बंगालमधील निर्वासितांची समस्या खूप जुनी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोष देणे योग्य नव्हे. भाजपला सत्तेवर येण्यासाठी मगोपने साहाय्य केले; मात्र भाजपने सर्वांचाच घात केला.’’

क्षणचित्र : सार्वजनिक सभेत भाषण करतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘चंडीपाठ’ म्हटला आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.