योग्य पेय प्यायल्यावरच आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन आरोग्य सुधारते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘पेय पदार्थांवरील संशोधन’ लंडन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !

मुंबई – सकारात्मक प्रभावळ असलेल्या पेय पदार्थांचा आपल्यावर लक्षणीय सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर आरोग्य सुधारते आणि रोगांचा धोका न्यून होतो, तसेच नकारात्मकता त्रास होण्याची शक्यताही घटते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. लंडन, युनायटेड किंगडम येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘सेव्हनटीन्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन न्युट्रिशन अँड हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘अलाईड ॲकॅडमीज्, यू.के.’ यांनी केले होते. श्री. क्लार्क यांनी ‘पेय पदार्थांचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क

श्री. क्लार्क यांनी त्यांच्या सादरीकरणात पेय पदार्थांशी संबंधित महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे पुढील संशोधन मांडले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला मिळालेले मुख्य वक्ता आणि सहभागी झाल्याविषयीचे प्रमाणपत्र

१. ‘अन्न आणि पेय पदार्थ यांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनानंतर व्यक्तीच्या प्रभावळीवर त्यांचा परिणाम वेगाने होतो. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ८ पेयपदार्थांचा व्यक्तींच्या प्रभावळीवर होणारा सूक्ष्म परिणाम अभ्यासला. ११.४ टक्के अल्कोहोल असलेल्या ‘रेड वाईन’ची प्रभावळ सर्वाधिक नकारात्मक होती. त्यानंतर अनुक्रमे ‘व्हिस्की’, ‘बिअर’ आणि ‘कोला’ ही पेये नकारात्मक प्रभावळ असणारी होती. बाटलीबंद पाण्याची प्रभावळही नकारात्मक होती, तर नारळाचे पाणी, संत्र्याचा रस, देशी गायीचे दूध आणि आध्यात्मिक संशोधन केंद्रातील पाणी यांमध्ये नकारात्मक प्रभावळ मुळीच नव्हती, उलट सकारात्मक प्रभावळच होती.

२. मुंबईतील एकाच भागातील दोन घरांतील पाण्याच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, ज्या घरामधील व्यक्ती आध्यात्मिक साधना करणार्‍या होत्या, त्या घरातील पाण्याची प्रभावळ सकारात्मक होती, तर ज्या घरात कुणीही आध्यात्मिक साधना करत नव्हते, तेथील पाण्याची प्रभावळ नकारात्मक होती. त्यामुळे घरातील सात्त्विक वातावरणाचा सकारात्मक परिणाम पाण्यावरही होतो, हे दिसून आले.

३. एका चाचणीत एक पुरुष आणि एक महिला अशा दोन जणांना प्रतिदिन एक पेय याप्रमाणे आठ वेगवेगळी पेये पिण्यास दिली. त्या दोघांचे प्रतिदिन पेय प्यायल्यानंतर ५ मिनिटांनी आणि ३० मिनिटांनी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ याद्वारे निरीक्षण करण्यात आले.

या चाचणीतून मिळालेल्या निष्कर्षानुसार व्यक्तीच्या प्रभावळीवर सकारात्मक परिणाम करणार्‍या पेयांपैकी देशी गायीचे दूध प्यायल्यावर दोघांची सकारात्मक प्रभावळ ५०० ते ६०० टक्क्यांनी वाढली आणि नकारात्मक प्रभावळ जवळजवळ ९१ टक्के घटली, म्हणजे दोघांच्याही प्रभावळीवर देशी गायीच्या दुधाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला. नारळाचे पाणी प्यायल्यावर एकाची सकारात्मक प्रभावळ ९०० टक्के आणि दुसर्‍याची २९१ टक्के वाढली. संत्र्याचा रस प्यायल्यावर सकारात्मक प्रभावळ ३५८ टक्के वाढली आणि नकारात्मक प्रभावळ ८५ टक्के घटली. आध्यात्मिक संशोधन केंद्रातील पाण्यामुळे नकारात्मक प्रभावळ लक्षणीय प्रमाणात घटली.

व्यक्तीच्या प्रभावळीवर नकारात्मक परिणाम करणार्‍या पेयांपैकी ‘व्हिस्की’, ‘बिअर’ आणि ‘वाईन’ या अल्कोहोल असलेल्या पेयांमुळे चाचणीतील दोन्ही व्यक्तींची सकारात्मक प्रभावळ पेय प्यायल्यानंतर पाच मिनिटांतच पूर्णपणे नष्ट झाली. त्यांच्यावर बिअरचा नकारात्मक परिणाम सर्वाधिक होता. बिअर प्यायल्यानंतर दोघांपैकी एकाची नकारात्मक प्रभावळ ५ सहस्र टक्के वाढली. वाईन प्यायल्यावर ३० मिनिटात चाचणीतील महिलेची नकारात्मक प्रभावळ ३ सहस्र ६९१ टक्के आणि पुरुषाची १ सहस्र ३९६ टक्के वाढली. कोला या पेयाचाही दोघांवर नकारात्मक परिणाम झाला.

४. ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या उपकरणाचा वापर करून केलेल्या अभ्यासात वाईन पिण्यापूर्वी व्यक्तीची सर्व कुंडलीनी चक्रे साधारणपणे सरळ रेषेत आणि व्यवस्थित आकारात होती, म्हणजे ती व्यक्ती स्थिर आणि ऊर्जावान होती; पण वाईन प्यायल्यानंतर तिची कुंडलिनी चक्र अव्यवस्थित आणि अन्य चक्रे आकाराने लहान झाली, म्हणजे ती व्यक्ती अस्थिर होऊन तिची क्षमताही घटली.

५. एका मेजवानीत सहभागी झालेल्या दहा जणांवर केलेल्या एका चाचणीत अल्कोहोल असलेले पेय पिणारे आणि अल्कोहोल नसलेले पेय पिणारे अशा सर्वांचीच सकारात्मक प्रभावळ नष्ट झाल्याचे आढळले. त्या मेजवानीत आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा वाढवणारी कोणतीही कृती नसल्याने वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचा परिणाम अल्कोहोल नसलेले पेय पिणार्‍यांवरही झाला आणि त्यांची नकारात्मक प्रभावळ वाढली.

६. सकारात्मक स्पंदने असणारी गायीचे दूध, नारळाचे पाणी, संत्र्याचा (फळांचा) रस ही पेये व्यक्ती आणि समाज यांच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असतात, हे या संशोधनाद्वारे लक्षात येते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने हे ८४ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १५ राष्ट्रीय आणि ६८ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. यापैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ मिळाले आहेत.