६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल (वय ५ वर्षे) !

‘आम्ही आगरा येथील रहिवासी आहोत. मी ‘फेसबूक’च्या माध्यमातून पू. तनुजा ठाकूर यांच्या संपर्कात आलो. वर्ष २०११ मध्ये आगरा येथे त्यांचे प्रवचन झाले होते. तेव्हापासून मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. साधना आणि धर्माशी संबंधित त्यांनी सांगितलेल्या सूत्रांचे पालन केल्याने माझ्या जीवनात पुष्कळ सकारात्मक पालट झाले आहेत.

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांप्रती भाव असलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल (वय ५ वर्षे) !

पू. तनुजा ठाकूर

१. मायेपासून अलिप्त

‘चि. आराध्या रामनाथी आश्रमात आल्यावर मी तिला विचारले, ‘‘तू तुझ्या आई-वडिलांविना आश्रमात रहाशील का ?’’ तेव्हा ती पटकन ‘हो’ म्हणाली, म्हणजेच तिला मायेच्या संबंधित कोणतीच आसक्ती नसल्याचे माझ्या लक्षात आले.

२. सेवेची तळमळ

आराध्या तिचे आई-वडील आणि काही साधक यांच्यासह रामनाथी आश्रमात आली आहे. आश्रमात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी तिने सर्व प्रौढ साधकांचे संपूर्ण दिवसाचे नियोजन ऐकले. त्या वेळी तिने मला विचारले, ‘‘माझ्यासाठी कोणती सेवा आहे ? माझे नियोजन काय आहे ?’’

३. संतांप्रतीचा भाव

अ. मी तिच्या पालकांना तिचे छायाचित्र रामनाथी आश्रमात पाठवण्यास सांगितले होते. तेव्हा तिचे छायाचित्र काढण्यासाठी ते एका ‘स्टुडिओ’मध्ये गेले. तिथे तिने छायाचित्र काढतांना नमस्काराची मुद्रा केलेली पाहून तिचे आई-वडील आणि छायाचित्रकार यांनी तिला हात खाली करण्यास सांगितले. त्यावर ती म्हणाली, ‘‘हे छायाचित्र प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) आणि पू. तनुजादीदी यांच्याकडे पाठवणार, तर त्यांना नमस्कार केला पाहिजे’’ आणि तिने नमस्काराच्या मुद्रेतील छायाचित्रच काढले. यावरूनच ‘दैवी बालकांचा संतांप्रती भाव कसा असतो ?’, हे माझ्या लक्षात आले.

आ. एका संतांच्या भेटीत तिला बोलण्यास सांगितल्यावर ती ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः ….’ हा श्लोक म्हणू लागली. तिच्या या कृतीमुळे संतांनीही तिचे कौतुक केले.

इ. रामनाथी आश्रमातील एका संतांच्या भेटीत आराध्या ६ घंटे शांत बसली होती.

ई. आराध्याने रामनाथी आश्रमात आल्यावर मला विचारले, ‘‘प.पू. गुरुदेव आता काय करत आहेत ?’’ त्या वेळी मला तिच्या डोळ्यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची ओढ दिसत होती.

उ. एका संतांनी आराध्याला विचारले, ‘‘तुला सर्वांत अधिक कोणती देवता आवडते ?’’ त्यावर ती त्वरित म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले !’’

– पू. तनुजा ठाकूर (८.११.२०२१)

श्री. मनीष सहगल, चि. आराध्या सहगल आणि सौ. हेमा सहगल

१. जन्मापूर्वी

अ. पू. तनुजादीदींच्या आज्ञेनुसार माझ्या पत्नीच्या गरोदरपणापासून आम्ही ‘गर्भावर साधनेचे संस्कार होतील आणि वाईट शक्तींपासून गर्भाचे संरक्षण होईल’, यांकडे लक्ष दिले.

आ. पू. दीदींनी आम्हाला सांगितले, ‘‘गर्भधारणेच्या काळात बाळाच्या आईने सात्त्विक आहार घेतल्याने आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे बाळाची साधना गर्भातच होऊन बाळाला वाईट शक्तींचा त्रास अल्प प्रमाणात होतो.’’ त्याप्रमाणे माझ्या पत्नीने स्वतःच्या नाभीच्या तीन इंच खाली पोटावर हात ठेवून नामजप केला. आम्ही पू. दीदींच्या मार्गदर्शनानुसार कृती केली आणि आम्हाला आराध्या दैवी बालिकेच्या रूपात मिळाली.

२. जन्मानंतर

२ अ. जिज्ञासू वृत्ती : आराध्या घरातील सर्वांना अध्यात्माच्या संदर्भात प्रश्न विचारत असते.

२ आ. सात्त्विकतेची ओढ

१. तिला सात्त्विक जेवण प्रिय आहे. तिला लहानपणापासून दूध, दही, खीर आणि मठ्ठा आवडतो. ती ‘पिझ्झा’, ‘बर्गर’ इत्यादी कधीच मागत नाही.

२. वयाच्या दुसर्‍या वर्षापासून तिला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने प्रिय आहेत.

३. तिला ‘काळा रंग तमोगुणी आहे आणि त्यामुळे मन अन् बुद्धी यांवर त्रासदायक आवरण निर्माण होते’, हे ठाऊक आहे. तिने स्वतः आजपर्यंत कधी काळे कपडे घातले नाहीत. ‘काळे कपडे घालू नका’, असे ती इतरांनाही सांगते.

२ इ. संस्कृत श्लोकपठणामुळे आराध्याचे उच्चार स्पष्ट होणे : आम्हाला पू. दीदींनी सांगितले होते, ‘‘लहानपणापासूनच मुलांना संस्कृत श्लोक शिकवले, तर बाळ तेजस्वी होते, तसेच त्याचे उच्चारही स्पष्ट होतात.’’ आराध्या अडीच वर्षांची असल्यापासून तिने संस्कृत श्लोकांचे पाठांतर करणे चालू केले. त्यामुळे तिचे उच्चारही स्पष्ट झाल्याचे आम्हाला जाणवले.

२ ई. नामजपाची आवड : पू. तनुजादीदींनी आम्हा सर्व साधकांना ‘रात्री झोपण्यापूर्वी नामजप केल्याने वाईट शक्ती आपल्याभोवती त्रासदायक आवरण निर्माण करत नाहीत आणि आपल्याला चांगली झोप येण्यास साहाय्य होते’, असे शिकवले आहे. आराध्या २ वर्षांची असल्यापासूनच नामजप करते. ती वयाच्या तिसर्‍या वर्षापासून रात्री नियमित नामजप करून झोपते.

२ उ. आराध्या दिवसभरात तिच्याकडून झालेल्या चुकांविषयी देवाकडे क्षमायाचना करून झोपते.

२ ऊ. तिला उपाय म्हणून मिठाच्या पाण्याने अंघोळ करायला आवडते आणि ती ते कधीच विसरत नाही.

२ ए. आराध्या तिच्या संपर्कात येणार्‍या परिचितांना नामजप करण्यास प्रेरित करते.

२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देव मानते. आम्ही विमानाने गोव्याला येत असतांना एका सहप्रवाशाने तिला विचारले, ‘‘तुम्ही कुठे जात आहात ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आम्ही प.पू. गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) जात आहोत. ते आमचे देव आहेत.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले ही तिची प्रिय देवता आहे.

३. अनुभूती – ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप केल्याने प्राणशक्ती वाढणे

आराध्या २ वर्षांची असतांना पू. तनुजादीदी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी तिला प्रथमच पाहिले. तिला पाहून त्या म्हणाल्या, ‘‘तिची प्राणशक्ती न्यून आहे. तिला न्यूनतम एक वर्ष ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगा आणि तुम्हीही एक वर्ष ती झोपल्यानंतर १५ – २० मिनिटे तिच्या डोक्यावर हात ठेवून नामजप करा. तिला थोड्या वेळासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगा.’’ पू. दीदींनी तिला ज्ञानमुद्रा (तर्जनीचे टोक अंगठ्याच्या टोकाशी जुळवणे) करण्यास सांगितली. तिला याविषयी सांगितल्यावर तिने स्वतः त्याप्रमाणे करणे चालू केले. हे सर्व केल्याने तिची प्राणशक्ती वाढली आणि तिच्यावर नामजपाचा संस्कार झाला.’

– श्री. मनीष सहगल (वडील), आगरा, उत्तरप्रदेश. (८.११.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक