श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार प्राप्त !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘वारसास्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर

  • सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे लाभदायक ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे आहेत शोधनिबंधाचे लेखक आणि श्री. शॉन क्लार्क सहलेखक ! – संपादक 

श्री. शॉन क्लार्क

मुंबई – जगभरातील अनेक प्रेक्षणीय वारसास्थळांना पर्यटक भेट देत असतात; मात्र त्या वारसास्थळांना भेट दिल्यावर त्याचा व्यक्तीवर काय परिणाम होतो, याचा आपण कधी विचार करत नाही. या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक संशोधन केले आहे. या संशोधनात लक्षात आले की, काही वारसास्थळे अशी आहेत की, जिथे गेल्यावर आपल्याला विविध प्रकारचे त्रास जाणवतात किंवा आपल्यातील नकारात्मकता वाढते, तर काही वारसास्थळांना भेट दिल्यावर आपल्याला चांगले वाटते, तेथून चांगली अर्थात सकारात्मक ऊर्जा मिळते. यातून असे सिद्ध होते की, आपण सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे, हे लाभदायक आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ यांनी श्रीलंकेत ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘द्वितीय आंतरराष्ट्रीय पुरातत्व विभाग, इतिहास आणि वारसा स्थळे २०२१’ या परिषदेत बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘वारसास्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधनिबंध या परिषदेत सादर केला. या शोधनिबंधाला या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ हा पुरस्कार मिळाला.

श्री. शॉन क्लार्क यांना ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ या संस्थेकडून मिळालेले प्रमाणपत्र

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १५ राष्ट्रीय आणि ६५ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’ मिळाले आहेत.

१. ‘वारसास्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या शोधनिबंधात वारसास्थळांच्या परिसरातील पाण्याच्या नमुन्यांची छायाचित्रे, तसेच वारसास्थळांची छायाचित्रे यांचा उपयोग करून हे संशोधन करण्यात आले.

२. हे संशोधन सादर करतांना श्री. क्लार्क यांनी पाण्याने भरलेले ५ पेले असलेले छायाचित्र सर्वांना दाखवले आणि त्यांतील स्वच्छ पाणी असलेले २ पेले कसे निवडता येतील, हे सांगितले. सर्वांत स्वच्छ दिसणार्‍या एका पेल्यातील पाणी भारतातील ताजमहालच्या परिसरातील होते आणि किंचित् गढूळ पाणी ताजमहालाजवळून वहाणार्‍या यमुना नदीचे होते. युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाने केलेल्या चाचणीत यमुना नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले; परंतु ताज महाल परिसरातील पाण्यात नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.

३. याच प्रकारे वर्ष २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या वेळी राजयोगी (शाही) स्नानाच्या दिवशी २ कोटी यात्रींनी पवित्र अशा त्रिवेणी संगमात मंगल स्नान केले. असे असूनही त्यांतील सकारात्मकता आदल्या दिवशीच्या तुलनेत वाढली असल्याचे संशोधनात दिसून आले.

४. कोणत्याही वस्तूच्या किंवा वास्तूच्या छायाचित्रात त्या वस्तूतील किंवा वास्तूतील सूक्ष्म स्पंदने असतात आणि ती छायाचित्रांतूनही प्रक्षेपित होतात. यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे ही सूक्ष्म स्पंदने सकारात्मक आहेत कि नकारात्मक ? तसेच त्याची प्रभावळ किती लांबपर्यंत आहे, हे मोजता येते. यू.ए.एस्. या उपकरणाच्या आधारे ५ जगप्रसिद्ध वारसास्थळे आणि भारतातील प्रसिद्ध मंदिर यांच्या छायाचित्रांतील सकारात्मकता आणि नकारात्मकता मोजण्यात आली.

५. या संशोधनातून रोममधील ‘कोलोसियम’च्या छायाचित्राची नकारात्मकता ४३३ मीटर, भारतातील एका प्रसिद्ध ठिकाणच्या छायाचित्राची नकारात्मकता ३७६ मीटर, इंग्लंडमधील ‘स्टोनहेन्ज’च्या छायाचित्राची नकारात्मकता ३४८ मीटर, इटलीतील ‘लिनिंग टॉवर ऑफ पिसा’च्या छायाचित्राची नकारात्मकता २५२ मीटर, इजिप्तमधील ‘पिरॅमिड्स ऑफ गिझा’च्या छायाचित्राची नकारात्मकता २१६ मीटर असल्याचे दिसून आले. यू.ए.एस्. उपकरण वापरून आतापर्यंत मोजण्यात आलेली ही सर्वाधिक नकारात्मकता आहे.

६. वरीलपैकी एकाही वारसास्थळात सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याच प्रकारे आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या छायाचित्राचेही संशोधन करण्यात आले. या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २७१ मीटर इतकी अधिक होती, तर नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती.

संशोधनाचा निष्कर्ष

सकारात्मक स्थळे सकारात्मकता आकर्षून घेतात, म्हणून ती मंगलमय असतात. त्यामुळे नकारात्मकता प्रक्षेपित करणार्‍या वारसास्थळांना भेट देणे शक्यतो टाळावे, असा निष्कर्ष या संशोधनातून निघतो.