केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा ! – विश्‍व हिंदु परिषद

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण

विश्‍व हिंदु परिषदेने नवी देहलीतील बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने नवी देहलीतील बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. ‘हिंदूंंवर होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा’, असे विहिंपने या वेळी म्हटले.

विहिंपने या वेळी म्हटले की,

१.  बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंचा नरसंहार चालू आहे. संयुक्त राष्ट्रे डोळे बंद करून बसली आहेत. ज्या पद्धतीने हिंदूंचा नरसंहार होत आहे, त्यातून बांगलादेश हिंदूविहीन देश बनवण्याकडे वाटचाल चालू आहे.

२. बांगलादेशच्या निर्मितीपासूनच हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. बांगलादेशातील शेख हसिना सरकारकडून आतंकवाद्यांना प्रोत्साहन दिले जाते. बांगलादेश सरकारने या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांनी उलट भारत सरकारलाच धमकी दिली.

३. बांगलादेश घटनात्मकरित्या ‘इस्लामी देश’ आहे. जेवढे इस्लामी देश आहेत, त्या सर्वांचे चरित्र एकसारखे आहे. तेथून अल्पसंख्यांकांना हटवले जाते. जर तुम्हाला विकासाकडे वाटचाल करायची असेल, तर तुम्हाला स्वत:च्या प्रतिमेत पालट करावा लागेल. बांगलादेशला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवावे लागेल आणि कट्टरतावाद्यांना वेळीच आळा घालावा लागेल. शेख हसिना सरकारला हे जमत नसेल, तर त्यांनी भारत सरकारकडे साहाय्याची मागणी करावी. वर्ष १९७१ प्रमाणेच आम्ही साहाय्य करू शकतो.

पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावे ! – विहिंपची मागणी

विकासाच्या वाटेवर असणार्‍या काश्मीरमध्ये पाककडून काही फुटीरतावाद्यांच्या साहाय्याने आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानला ‘शत्रू राष्ट्र’ घोषित करावे, तसेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामान्यांवरही बंदी घालावी.