आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

१. एका वैज्ञानिक सिद्धांतानुसार ‘शक्ती निर्माण करता येत नसणे किंवा ती नष्टही करता येत नसणे, केवळ तिचे रूपांतर एका शक्तीतून दुसर्‍या शक्तीत होणे’

‘एक वैज्ञानिक सिद्धांत आहे, ‘शक्ती कधीही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती केवळ एका रूपातून दुसर्‍या रूपात रूपांतरित होते.’ (Energy cannot be created nor destroyed; it can only be changed from one form to another.)

जो नियम विज्ञानाला आता कळला आहे, तो नियम सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून आहे. वाईट शक्ती या एकप्रकारे शक्तीचे एक रूप आहेत; मात्र त्यांचे कर्म, विचार आणि ध्येय विरुद्ध असल्याने त्यांना ‘वाईट शक्ती’, असे म्हटले जाते. वाईट शक्ती कधी मरत नाहीत; पण त्यांची शक्ती न्यून होते. त्यांची शक्ती न्यून झाली की, त्या पाताळात जाऊन साधना करून दुसरे रूप धारण करून परत पृथ्वीवर येतात’, असे अध्यात्म म्हणते. जय-विजय यांनी पृथ्वीवर हिरण्याक्ष-हिरण्यकश्यपू, रावण-कुंभकर्ण आणि शिशुपाल-दंतवक्र या रूपांत जन्म घेतले. महाभारत युद्धाच्या वेळी नरकासुराने सूर्यपुत्र कर्णामध्ये प्रवेश केला आणि दानात अग्रेसर असलेल्या कर्णाला दुर्याेधनाच्या बाजूने लढण्याची बुद्धी झाली.

२. रंभाच्या चिताग्नीतून रक्तबिजाची निर्मिती होणे, आदिशक्ति जगदंबेने अनेक रूपे धारण करून अनेक असुर मारणे, त्यानंतर शुंभने महापराक्रमी ‘रक्तबीज’ असुराला देवीशी युद्ध करायला पाठवणे

‘रंभ’ या महाबली असुराचे दुसरे रूप म्हणजे ‘रक्तबीज’ असुर होय ! रंभाच्या चिताग्नीतूनच रक्तबिजाची निर्मिती झाली आहे. महिषासुराचा वध झाल्यावर शुंभ-निशुंभ नावाचे महापराक्रमी राक्षस दानवांचे राजा बनतात. त्यांच्या अधिपत्याखाली असलेला ‘रक्तबीज’ हा असुर मोठा पराक्रमी आणि चाणाक्ष असतो. शुंभ-निशुंभ या दानवांच्या संहारासाठी आदिशक्ति जगदंबा अनेक रूपे धारण करते. देवीशी झालेल्या युद्धात शुंभ-निशुंभचे अनेक सैनिक आणि मोठे पराक्रमी असुर मारले जातात. शुंभ-निशुंभचे सेनापती चंड-मुंडही देवीशी झालेल्या युद्धात मारले जातात. चंड-मुंड यांना मारण्यासाठी देवी चंडी आणि चामुंडा हे रूप धारण करते. चंड-मुंड यांच्या मृत्यूनंतर शुंभ महापराक्रमी ‘रक्तबीज’ असुराला देवीशी युद्ध करायला पाठवतो. देवी युद्धभूमीत मध्यभागी सिंहावर विराजमान असते आणि तिची चंडी, चामुंडा, अंबिका, काली आदी रूपे असुरांशी युद्ध करत असतात.

३. ‘रक्तबीज असुराच्या रक्ताचा एक थेंब जरी भूमीवर पडला, तरी त्यातून त्याच्यासारखाच शक्तीशाली रक्तबीज असुर निर्माण होईल’, असे वरदान त्याला भगवान शिवाकडून प्राप्त होणे

रक्तबीज देवीशी युद्ध करायला येतो आणि आरंभी तो देवीच्या सिंहावर आक्रमण करतो. देवी बाण सोडून त्याला मूर्च्छित करते. थोड्या वेळाने तो मूर्च्छितावस्थेतून बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याला राग येतो आणि तो त्याची मायावी शक्ती वापरण्याचे ठरवतो. रक्तबिजाकडे अशी मायावी शक्ती असते की, ‘त्याचे रक्त भूमीवर पडले की, त्याच्या रक्ताच्या एकेका थेंबातून त्याच्यासारखा दिसणारा आणि त्याच्या एवढाच बलशाली असुर सिद्ध होतो.’ यासाठीच त्याला ‘रक्तबीज’ असे नाव पडलेले असते. त्याने भगवान शिवाकडून हे वरदान मागून घेतलेले असते. शापाला उःशाप असतो, तसेच असुरांनी मागून घेतलेल्या विचित्र वरदानातही ईश्वरी युक्ती असतेच. देव असुरांना वरदान देतांना असे एकतरी द्वार उघडे ठेवतो, जेथून त्याला आत येऊन असुरांना मारता येते.

युद्धभूमीत आदिशक्तीची अनेक रूपे प्रकट होतात. शेवटी श्रीविष्णूची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून युद्धभूमीत येते आणि सुदर्शनचक्राने रक्तबिजाचे डोके शरिरापासून वेगळे केल्यावर त्याच्या शरिरातून रक्ताचा फवारा उडतो. जेथे जेथे रक्तबिजाचे रक्त पडते, तेथे तेथे त्याच्या रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारखा एक-एक असुर सिद्ध होतो. ब्रह्मणी, माहेश्वरी, एैंद्री, नारसिंही, वाराही अशा अनेक देवी रक्तबिजावर शस्त्राने आघात करतात; मात्र प्रत्येक वेळी अनेक पटींनी रक्तबिजासारखे असुर सिद्ध होतात.

४. आदिशक्तीने कालीदेवीला त्याचे सर्व रक्त प्यायला आणि त्याच्या कापलेल्या अवयवांतील रक्ताचा एक थेंबही खाली पडू न देता ते प्यायला सांगणे, त्यामुळे रक्तबीज असुराचा नाश होणे

शेवटी आदिशक्ति जगदंबा ठरवते, ‘आता पुरे झाले आणि ती कालीकडे बघून सांगते, ‘हे काली, आता तू तुझे तोंड उघडून रक्तबिजाच्या शरिरातून निघणारे रक्त प्यायला आरंभ कर. मी आणि अन्य देवी मिळून रक्तबिजाच्या सर्व रूपांना मारून टाकतो. हे देवी, तू त्याचे रक्त अशा प्रकारे प्यावेस की, त्याच्या रक्ताचा एकही थेंब भूमीवर पडू नये. आता हाच एकमेव उपाय आहे. मी रक्तबिजाला मारून टाकल्यावर तू त्याला संपूर्ण खाऊन टाक.’ आदिशक्तीचे हे बोल ऐकून कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले. रक्ताचा एकही थेंब शेष राहिला नाही. याप्रमाणे रक्तबिजाचा वध झाला. रक्तबिजाला मारून देवीने संपूर्ण सृष्टीला आनंदी केले. तेव्हा सर्व देवता आणि ॠषिमुनी आदिशक्ति जगदंबेवर पुष्पवृष्टी करू लागले.

५. रक्तबिजासारख्या वाईट दुष्प्रवृत्ती परत पृथ्वीवर आलेल्या असणे

आज रक्तबीज असुराची गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे सध्या या पृथ्वीवर पुन्हा रक्तबिजासारख्या वाईट दुष्प्रवृत्ती आल्या आहेत. अशा वाईट दुष्प्रवृत्ती सर्व देशांमध्ये आहेत. त्यांची संख्या रक्तबिजाच्या रक्तातून निर्माण होणार्‍या असुरांप्रमाणे गतीने वाढत आहे. ‘असे लोक रक्तबिजाचे कलियुगातील रूप आहेत’, असे आपण म्हणू शकतो. रक्तबिजाला नष्ट करण्याचे कार्य मानव करू शकत नाही. हे केवळ आणि केवळ आदिशक्तीच करू शकते; मात्र ‘ती हे कसे आणि केव्हा करणार ?’, हे भगवंतालाच ठाऊक आहे.

आपण सर्वांनी आपली भक्ती एवढी वाढवूया की, आदिशक्ति जगदंबा लवकर प्रकट होऊन वाईट दुष्प्रवृत्तीला नष्ट करील. ‘मोठ्या अनिष्ट शक्तीलाही मारू शकते’, अशी शक्ती भक्तीत आहे. ती भक्ती करण्यासाठी आपण आदिशक्तीचे भक्त होऊया आणि तिची कृपा संपादन करूया. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु !

– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू (२३.९.२०२१)