पुणे शहरात दहशत माजवणारे २ गुन्हेगार १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध !

गुन्हेगारांची दहशत संपून, पोलिसांचा जनतेला विश्वास वाटेल अशी प्रतिमा पोलीस कधी निर्माण करणार ?

पुणे, २ ऑक्टोबर – शहरातील वारजे-माळवाडी आणि भवानी पेठ, रास्ता पेठे येथे दहशत माजवणार्‍या शेखर खवळे अन् अरबाज उपाख्य बबन शेख या २ गुन्हेगारांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘एम्.पी.डी.ए.’ कायद्यान्वये एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. गेल्या एका वर्षात गुप्ता यांनी समाजात दहशत निर्माण करणार्‍या ४१ अट्टल गुन्हेगारांना ‘एम्.पी.डी.ए.’ कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.

गेल्या ५ वर्षांत खवळेवर हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, घरफोडी, दुखापत करणे, अवैधरित्या हत्यार बाळगणे यांसारखे ८ गंभीर गुन्हे नोंद आहेत, तर अरबाज शेख याच्यावर १३ गुन्हे नोंद आहेत. शेख याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे आणि भीतीने नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते. (पहिल्याच गुन्ह्यामध्ये धर्मांधाला कडक शिक्षा न झाल्याचा परिणाम ! धर्मांधाच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांना घाबरून रहावे लागणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)