तालिबानला भारतातील मुसलमानांची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – भारताचे तालिबानला प्रत्युत्तर

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

नवी देहली – तालिबानला भारतातील मुसलमानांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तालिबानला सुनावले आहे. ‘मुसलमान म्हणून तालिबानला भारतातील काश्मीरमधील किंवा अन्य कोणत्याही देशातील मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे’, असे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने केले होते. त्यावर नक्वी यांनी वरील प्रत्युत्तर दिले.

नक्वी म्हणाले की,

१. भारतात मशिदीत नमाजपठण करणार्‍या लोकांवर गोळीबार केला जात नाही, ना बाँबने आक्रमण केले जाते. येथे ना मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जाते ना त्यांचे मुंडके आणि पाय कापले जातात.

२. भारत आणि अफगाणिस्तान येथील परिस्थितीत पुष्कळ मोठे अंतर आहे. यासाठी आम्ही तालिबानला हात जोडून विनंती करतो की, येथील मुसलमानांची चिंता सोडून स्वत:वर लक्ष केंद्रित करा.

३. भारतात सर्वांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. भारतात धर्माच्या नावावर अराजकता पसरवली जात नाही. येथे केवळ एक धर्म मानला जातो आणि तो म्हणजे राज्यघटना. राज्यघटनेवरच देश चालतो आणि राज्यघटनाच सर्व स्तरांतील सर्व समाजाच्या नागरिकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देते.