अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

 रत्नागिरी येथे धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन साधनावृद्धी सत्संग सोहळा’

सद्गुरु सत्यवान कदम

रत्नागिरी – प्राथमिक टप्प्यावर धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमेसंबंधी केलेल्या विविध सेवांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत; मात्र अखंड गुरुकृपा संपादन करण्यासाठी गुरुसेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी उपस्थित धर्मप्रेमींना केले. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केलेल्या सेवांच्या प्रयत्नांविषयी त्याचे कौतुक करणे आणि साधनेच्या गुणात्मक वृद्धीसाठी त्यांना पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करणे’, या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन साधनावृद्धी सत्संग सोहळ्या’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम मार्गदर्शन करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या सोहळ्याचा उद्देश समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी सांगितला आणि सौ. अंतरा तेली यांनी सत्संगाचे सूत्रसंचालन केले. या वेळी काही धर्मप्रेमींनी त्यांना गुरुपौर्णिमेची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि अनुभव उपस्थितांना सांगितले.

साधनेत पुढील टप्प्यात दायित्व घेऊन सेवा करणे अपेक्षित ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमेच्या सेवेतून साधनेत प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न चालू केले आहेत. याला व्यष्टी साधनेची योग्य प्रकारे जोड देऊन सेवेचे दायित्व स्वीकारणे अपेक्षित आहे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत.