तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !

मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. हानीग्रस्त भागाची पहाणी करून ते गावकर्‍यांशी संवाद साधतील. यानंतर अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन चर्चाही करतील. तौक्ते वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांची हानी झाली आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे, तसेच मासेमारांच्या बोटींचीही हानी झाली आहे. यापूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचा दौरा करून हानीग्रस्त नागरिकांना तातडीने साहाय्य करण्याचे आवाहन राज्यशासनाकडे केले आहे.