आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अक्षय्य तृतीयेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन ‘श्रद्धा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

पू. नीलेश सिंगबाळ

पाटलीपुत्र (बिहार) – अनेक भविष्यवेत्ते आणि संंत यांनी पुढे भीषण आपत्काळ येणार असल्याचे भाकित केेले आहे. ‘नमे भक्त: प्रणश्यति ।’ अर्थात् ‘माझ्या भक्तांचा नाश होणार नाही’, असे भगवंताचे वचन आहे. त्यामुळेे अशा काळाचा सामना करण्यासाठी आम्हाला श्रद्धा वाढवण्यासाठी साधना केली पाहिजे. श्रद्धापूर्वक साधना केल्यामुळे अनेक जण त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन अनुभवत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी ऑनलाईन ‘श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमात केेले.

१. आज संपूर्ण जग कोरोना महामारीच्या तावडीत सापडले आहे. अशा स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आत्मबळाची आवश्यकता असते. ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने आपले मनोबल वाढते यादृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन ‘श्रद्धा संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बिहार आणि उत्तरप्रदेश समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाचा लाभ उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमधील अनेक जिज्ञासूंनी घेतला.

२. विविध देशांमध्ये प्रार्थनेवर करण्यात आलेल्या संशोधनाविषयी सांगतांना सौ. प्राची जुवेकर म्हणाल्या, ‘‘या संशोधनानुसार श्रद्धा आणि प्रार्थना यांमुळे कर्करोगाच्या ८ रुग्णांपैकी ७ रुग्णांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली. अशाच प्रकारे उच्च रक्तदाबाचे ५ पैकी ४ रुग्ण, हृदयविकाराचे ६ पैकी ४ रुग्ण, तर सर्वसामान्यपणे ५ पैकी ४ रुग्णांत श्रद्धा आणि प्रार्थना यांमुळे सुधारणा झाली.’’

३. अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी करण्यात आलेले दान, पुण्य, आणि साधना यांचा क्षय होत नाही. कोरोना विषाणूंच्या विरुद्ध स्वत:तील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक आहे. त्यासाठी नामजप सांगणारे ‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, असे आवाहन श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी केले.

क्षणचित्रे

१. सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी ‘कोरोनाच्या या कठीण काळात ईश्‍वराला प्रार्थना कशी करावी ?’, याविषयी माहिती दिली.

२. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रम संपल्यावरही जिज्ञासू साधनेविषयी प्रश्‍न विचारून घेत होते. त्यांनी समितीच्या अन्य आयोजनांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.