‘प्राचीन तक्षशीला, नालंदा आणि गुरुकुल यांसारखे सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गुरुकृपेने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना झाली. हे जगातील सर्वांत पहिले अध्यात्म विश्‍वविद्यालय आहे. ‘प्राचीन तक्षशीला, नालंदा आणि गुरुकुल यांसारखे सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या विद्यालयाची स्थापना केली’, हे सर्वविदित आहे. ‘कोणत्याही कलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती करता येते’, याविषयी येथे मार्गदर्शन केले जाते, तसेच साधकाला साधनेला पूरक आणि आवश्यक गोष्टी विविध प्रकारे शिकवल्या जातात.

१. ‘या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्या विद्यालयातले प्रमाणपत्र आवश्यक आहे ?’, असे एका व्यक्तीने विचारणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आहे, तर महाविद्यालय, विद्यालय आणि त्या खालचे वर्गही असणारच’, असे गृहीत धरून समाजातील एका व्यक्तीने उत्सुकतेने विचारले, ‘‘या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्या शाळेतले/विद्यालयातले प्रमाणपत्र आवश्यक आहे ?’’ या प्रश्‍नाचे उत्तर ‘काय द्यावे ?’, हे मला सुचेना. तेव्हा मी देवाला प्रार्थना केली. ईश्‍वराने सुचवल्याप्रमाणे मी सांगितले, ‘‘त्याची काळजी नको. प्रवेश घेतांना तुम्हाला सर्व माहिती सांगण्यात येईल.’’

सौ. नीलिमा सप्तर्षि

२. बराच वेळ विचार आणि चिंतन केल्यावर ईश्‍वराने अभ्यासक्रमाची सुचवलेली वर्गवारी

अ. साधनेचे महत्व समजून घेणार्‍या समाजातील व्यक्ती : शिशु वर्ग (नर्सरी)

आ. दैनिक किंवा पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्याची गोडी लागणे आणि नियमित अंकवाचन : बालवाडी

इ. सत्संगात येणारे (श्रवण) : प्राथमिक (प्रायमरी) शाळा

ई. सेवेत थोड्या प्रमाणात भाग घेणारे : माध्यमिक (मिडल) शाळा

उ. साधना समजल्याने तन, मन आणि धन यांचा त्याग करणारे : उच्च माध्यमिक विद्यालय (हायस्कूल)

ऊ. यानंतर गुरुचरणी समर्पणभाव असल्याने पदाची अभिलाषा न्यून होते. साधनेचे महत्व कळल्याने भावपूर्ण साधना वाढत असते. ‘कोणता शिष्य कोणत्या पदास योग्य आहे ?’, याचा विचार करून गुरु त्या शिष्याला त्या पदाने विभूषित करून त्याचा सत्कार करतात. या शिक्षणपद्धतीचे नाव आहे, ‘गुरुकृपायोग’ !

त्या व्यक्तीने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’संबधी माहिती विचारल्याने मला वरील विचार ईश्‍वराने सुचवले. ते मी लिहिले. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. नीलिमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक