खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्यास अनुमती द्या !

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून केंद्र सरकारकडे मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफ्.एस्.एस्.ए.आय.) वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे खाद्यपदार्थांचे प्लास्टिक पॅकेट रिसायकल करण्याची अनुमती मागितली आहे. ग्राहकाने प्लास्टिक बाटली कचर्‍यात फेकण्याऐवजी दुकानदाराला परत दिल्यास पैसे देण्याची योजना एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून बनवली जात आहे.

१. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या बंदीमुळे प्लास्टिकमध्ये बांधलेल्या खाद्यपदार्थाच्या वापरानंतर त्या प्लास्टिकचा पुन्हा वापर करता येत नाही. एफ्.एस्.एस्.ए.आय.ने ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. देशात जे खाद्यपदार्थ प्लास्टिक पाकिटात मिळतात, त्यात ४३ टक्के एक वेळा वापर करता येणारे प्लास्टिक आहे.

२. एफ्.एस्.एस्.ए.आय.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी सांगितले की, आम्ही पाकीटबंद अन्न उत्पादन करणार्‍या आस्थापनांंसमवेत बैठक घेत आहोत.  प्लाास्टिक बाटली दुकानदाराला परत देणार्‍या ग्राहकाला काही पैसे द्यावेत. तसेच दुकानातून त्या बाटल्या घेण्याची व्यवस्था आस्थापनांनी करावी, असे त्यांना सांगणार आहोत.