गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सहजतेने अन् निरपेक्ष प्रेमाने सर्वांना आपलेसे करणार्‍या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

१. सहजता आणि प्रीती

अ. ‘पूर्वी सद्गुरु ताई कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या, तरी मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांच्याविषयी काहीच वाटत नसे. मला ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटत नसे किंवा त्यांच्या समोर उभे रहाण्याची इच्छाही होत नसे. आता त्यांच्यातील प्रीती आणि त्यांच्या वागण्यातील सहजता यांमुळे मला ‘त्यांच्या सहवासात रहावे’, असे वाटू लागले आहे.

आ. सद्गुरुताई सेवाकेंद्रातून दुसरीकडे वास्तव्याला जातांना त्यांना सोडायला उभे असलेल्या साधकांना त्या गाडी पुढे गेली, तरी शेवटपर्यंत हात दाखवतात. त्या वेळी सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ आनंद जाणवतो आणि ‘सद्गुरुताई साधकांवर प्रीतीचा वर्षाव करत आहेत’, असे मला वाटते.

२. इतरांचा विचार करणे

अ. एकदा दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु ताई कोल्हापूरला आल्या होत्या. त्या वेळी त्या घाऊक बाजारात खरेदी करून आल्यानंतर त्यांनी सेवाकेंद्रातील इतर साधकांनाही ‘बाजारात खरेदीला एकत्रितपणे कसे जाऊ शकतात ?’, हे सांगितले.

आ. एकदा सेवाकेंद्राच्या शेजारीच एका दुकानात पुष्कळ अल्प मूल्यात बॅग विकल्या जात आहेत, हे त्यांना समजले. त्यांनी लगेच त्यांची शिबिरे, बैठका चालू होत्या, तरीही त्या व्यस्त दिनक्रमातसुद्धा साधकांच्या बॅगेची मागणी घेतली आणि त्यांना त्या बॅगा पाठवण्याची व्यवस्था केली. यावरून ‘त्यांना लहानसहान गोष्टीतही साधकांचा कसा विचार असतो’, हे मला शिकायला मिळाले.

३. दिसेल ते कर्तव्य

एकदा सद्गुरुताई प्रवास करून आल्या होत्या. तेव्हा त्यांना स्वयंपाकघरात पटलावर निवडण्यासाठी ठेवलेली पालेभाजीची जुडी दिसली. त्यांनी लगेच ती भाजीची जुडी निवडायला घेतली. त्या वेळी सद्गुरुताईंची ती कृती पाहून ‘अशा संतांच्या सहवासात रहाण्याची संधी मिळाली’, यासाठी माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. गुरुकार्याची तळमळ

एकदा सद्गुरुताईंनी ग्रंथ विभागात काही लघुग्रंथांचे संच पाहिले. त्यांनी मला विचारले, ‘‘त्यांचे मूल्य किती होते ?’’ मी ‘१२० रुपये होतात’, असे सांगितल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘किती सुरेख ! आपल्याला हे प्रसारात भाऊबिजेसाठी भेट म्हणून द्यायला उत्तम आहेत.’’ त्यानंतर सद्गुरुताईंनी त्या लघुग्रंथांचा एक संच प्रसारात दाखवण्यासाठी घेतला. त्या वेळी सद्गुरुताईंच्या तोंडवळ्यावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता. या प्रसंगातून ‘सद्गुरुताईंची प्रत्येक कृती, विचार हा गुरुकार्याशी कसा जोडलेला असतो’, हे मला शिकायला मिळाले.

५. अनुभूती – सद्गुरु स्वातीताई यांच्यातील चैतन्यामुळे ध्यानावस्था अनुभवणे

एकदा सद्गुरुताई सकाळी ९.३० वाजता ध्यानमंदिरात नामजपाला बसल्या होत्या. त्या वेळी मीही नामजपासाठी ध्यानमंदिरात बसले. थोड्या वेळाने माझे मन इतके एकाग्र झाले की, मला ध्यानावस्था अनुभवता आली. नामजपाची वेळ संपली, हेही माझ्या लक्षात आले नाही. ४ – ५ मिनिटांनी सद्गुरुताईंनी ‘नामजपानंतर जी प्रार्थना करतात, ती आहे का ?’, हे विचारण्यासाठी मला हाक मारली; पण मला काही क्षण ‘त्यांनी हाक मारली’, हे लक्षात आले नाही. अशी स्थिती मला पुष्कळ वर्षांनी अनुभवता आली.

‘परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे आणि सद्गुरुताईंमधील चैतन्यामुळे मला ही ध्यानावस्था अनुभवता आली’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

६. त्रासदायक अनुभूती

वरील सूत्रांचे टंकलेखन करतांना माझा उजवा हात दुखत होता आणि मला पुष्कळ झोप येत होती.’

– सौ. सुमन महेश पेडणेकर, कोल्हापूर सेवाकेंद्र, कोल्हापूर. (२४.११.२०१९)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक