गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

  • गलवान संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन फोल !

  • भारताकडून जगभरात होणाऱ्या निर्यातीत मात्र २८ टक्क्यांची घट !

  • यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! एकीकडे चीनच्या साहित्यांवर बहिष्काराची भाषा केली जात होती, तेथे दुसरीकडे प्रसारमाध्यमे चिनी भ्रमषभाष आणि अन्य वस्तूंची विज्ञापने आणि वृत्त प्रकाशित करत होते ! अशामुळे भारत कधीतरी चीनला धडा शिकवू शकतो का ?
  • आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !

नवी देहली – गलवान खोर्‍यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षांत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले, तर चीनचे ४५ सैनिक ठार झाले. यानंतर भारतात चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर विविध माध्यमांद्वारे चिनी साहित्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. यानंतर केंद्र सरकारनेही चीनच्या अनेक आस्थापनांसमवेतचे करार रहित केले. परिणामस्वरूप चीनचा भारतातील व्यापार अल्प होण्याची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात गेल्या ८ मासांत तो अधिक होता, असे समोर आले आहे. या काळात भारतियांनी विदेशी वस्तूंची जितकी खरेदी केली, त्यांतील १८ टक्के वस्तू चीनमधील होत्या, अशी आकडेवारी समोर आली आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नोव्हेंबर २०२० पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे. याची तुलना वर्ष २०१९ शी केली, तरी ही खरेदी केवळ १५ टक्के होती. म्हणजेच गलवान खोर्‍यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांनी चीनच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. या उलट भारताची निर्यात २८ टक्क्यांनी घटली आहे. चीनमधील होणारी निर्यातही १२ टक्क्यांनी घटली आहे. याचाच अर्थ चीनच्या नागरिकांनी भारताचे साहित्य घेण्यास नकार दिला, याउलट भारतियांनी चीनचे साहित्य अन्य काळापेक्षा अधिक खरेदी केले.

१. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात १६ लाख ३३ सहस्र कोटी रुपयांचे विदेशी साहित्य भारतियांनी विकत घेतले, तर भारताने १३ लाख कोटी रुपयांचे साहित्य विदेशात विकले. यात १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक साहित्य चीनला विकले.

२. वर्ष २०११-१२ पर्यंत संयुक्त अरब अमिरात भारताशी व्यापार करणारा सर्वांत मोठा देश होता; मात्र त्यानंतर वर्ष २०१७ पर्यंत चीनने ही जागा घेतली आहे. पुढची २ वर्षे अमेरिकेने ही जागा घेतली आणि आता पुन्हा चीनने ही जागा घेतली आहे. गेल्या वर्षात भारत आणि चीन यांच्यात ३ लाख ९१ सहस्र कोटी रुपयांचा व्यापार झाला; मात्र यात चीनचा व्यापार अधिक आहे, तर भारताचा अल्प आहे. चीनचा व्यापार भारतापेक्षा १ लाख ८७ सहस्र कोटी रुपयांनी अधिक आहे.