‘गोवंश हत्याबंदी’ कायद्याची प्रभावी कार्यवाही आणि ‘लव्ह जिहाद’विषयी कठोर कायदा करावा ! – गोसेवकांची मागणी

धुळे ते मुंबई विराट पदमोर्चा !

गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना त्याची प्रभावी कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोसेवकांना पदमोर्चा काढणे सरकारसाठी लज्जास्पद !

धुळे, २७ जानेवारी (वार्ता.) – वर्ष २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. असे असतांनाही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रतिदिन मोठ्या प्रमाणावर गोवंशियांच्या हत्या होत आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा हा नुसताच कागदावर राहिल्याने आज मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या केली जात आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्रात या कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी.

हिंदु तरुणींना मुसलमान मुले प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून त्यांची फसवणूक करत आहेत. यासाठी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करावा, यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी धुळे ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. १० मार्च या दिवशी आझाद मैदानावर हा मोर्चा धडकणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत काही गोसेवक आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनाचे श्री. संजय शर्मा यांनी २५ जानेवारीला मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली.

जनआंदोलनाच्या प्राथमिक मागण्या –

१. गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळात ठराव संमत करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणे

२. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे विशेष पोलीस गोरक्षण पथक स्थापन करणे

३. अवैध पशूवधगृहांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सरकारजमा करणे

४. गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे, नकार देणारे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावरही गुन्हा नोंद करणे

५. राज्यभरातील गोरक्षकांवरील दबावाखाली प्रविष्ट केलेले सर्व खोटे गुन्हे मागे घेणे

६. गोहत्या करतांना सिद्ध झाल्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी.

७. गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे

८. तस्करीत आढळणारे वाहन कायमस्वरूपी जप्त करणे, वाहनांचा चालक, मालक, तस्करी करणारा यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंद करणे

९. संपूर्ण राज्यभरातील गायरान अतिक्रमणमुक्त करणे, मोकाट गुरांना जप्त करून गोशाळेत पाठवणे

१०. शेतकरी आणि सामान्य माणसाला गायीचे महत्त्व कळावे याकरिता गोवंश विकास संगोपन, गोपालन विषय दृष्टीक्षेपात ठेवून गाव ते शहर विशेष कार्यक्रम आखणे आणि सुविधा देणे

११. महानगरपालिका अधिनियमात पालट करून महापालिका क्षेत्रात गोपालनास अनुमती देणे

१२. गोशाळांच्या विकासासाठी निधी आणि कार्यक्रम घेणे

१३. गोशाळेतून होणारी गोवंश चोरी रोखण्यासाठी सर्वच गोशाळांना २४ घंटे सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करून देणे

१४. पंचगव्यचिकित्सा पद्धतीस मान्यता देणे, शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान विषय समाविष्ट करणे

१५. सर्व गोशाळांत सरकारी पशूवैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे

१६. महाराष्ट्रातील सर्व स्मशानभूमींत अंत्यसंस्काराकरिता गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्‍या आणि गोकाष्टचा वापर बंधनकारक करणे

१७. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रतही लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करावा

जन आंदोलनाचे प्राथमिकदृष्ट्या ठरलेले स्वरूप –


महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस ठरवून राज्यभरातील सर्व तालुक्यांत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होईल. एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या नंतर दिलेल्या वेळेत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभरातून गोवंशासह २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे येथील एकवीरा माता मंदिरापासून पायी मोर्चा १० मार्च या दिवशी आझाद मैदान (मुंबई) येथे धडकेल. मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलक पोचल्यावर मागण्या मान्य होईपर्यंत काही गोरक्षक बेमुदत आमरण उपोषणास बसतील. तरी महाराष्ट्रातील सर्व गोभक्त, गोरक्षक, गोशाळेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनाचे श्री. संजय शर्मा, भागवताचार्य राजीव कृष्णजी झा, डॉ. योगेश पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, श्री. केतन रघुवंशी, श्री. भगवान रेलन, हर्षल गवळी, मयुर चौधरी यांनी केले आहे.

संपर्क : ९४०५८४३८६७