दळणवळण बंदीच्या कालावधीत घरात राहूनही आश्रमात रहात असल्याविषयी आलेली अनुभूती

कोरोना महामारीमुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीतील पहिल्या ऑनलाईन भावसत्संगात (२६.३.२०२० या दिवशी) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, घरी राहून साधना करा. घराचा आश्रम करायचा आहे, म्हणजे आश्रमात राहून जसे साधनावृद्धीसाठी प्रयत्न करतो, तसे प्रयत्न घरात असतांनाही करायचे आहेत. आश्रमात जसे सात्त्विक वातावरण असते, तसे वातावरण आपण घरी ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्याप्रमाणे त्यांचा संकल्प कार्यरत झाला होता.

श्री. दिलीप नलावडे

१. घराचा आश्रम बनवण्यासाठी केलेले साधनेचे प्रयत्न

१ अ. प्रतिदिन करायच्या साधनेच्या प्रयत्नांचे नियोजन करणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेरणा घेऊन आम्ही उभयतांनी तसे प्रयत्न चालू केले. आम्ही प्रतिदिन करायच्या साधनेच्या प्रयत्नांचे नियोजन केले. आम्ही सकाळी उठल्यानंतर देवीकवच लावून साधना करायला आरंभ करायचो.

१ आ. संपूर्ण घराची स्वच्छता केल्यावर हलकेपणा जाणवणे : आम्ही प्रतिदिन घराची स्वच्छता करायचो. आम्ही घरातील स्वच्छतेचे लिखित स्वरूपात नियोजन करून दोघांनी प्रतिदिन करायच्या सेवा वाटून घेतल्या. संपूर्ण घराची स्वच्छता झाल्यानंतर आम्हाला घरामध्ये हलकेपणा जाणवू लागला.

१ इ. आम्ही प्रतिदिन घरात धूप दाखवत होतोे. त्यामुळे आम्हाला चांगले वाटून आमचा उत्साह वाढला.

१ ई. नामजपादी उपाय करणे : सकाळची नित्य कामे, उदा. व्यायाम, योगासने, स्नान, देवपूजा आटोपून आम्ही नामजपादी उपाय करत होतो. माझा सकाळी ३ – ४ घंटे नामजप पूर्ण होत असे. आम्ही सांगितलेले मंत्रजप नियमित पूर्ण करायचोे.

१ उ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करणे

१. आमचा प्रतिदिन दुपारी ३ वाजता व्यष्टी साधनेचा ऑनलाईन आढावा घेतला जात होता. वृषालीताई (कु. वृषाली कुंभार) आमच्याकडून झालेल्या चुका, त्या चुका कोणत्या स्वभावदोषांमुळे झाल्या ? स्वभावदोषाच्या मुळाशी कसे जायचे ? कृतीच्या स्तरावरील प्रयत्न कसे वाढवायचे ?, याविषयी सांगून आम्हाला दृष्टीकोन देत असे. त्यामुळे आमच्याकडून नियमितपणे प्रयत्न होत होते.

२. आम्ही प्रतिदिन आमच्या मनात आलेले अयोग्य विचार आणि प्रतिक्रिया एकमेकांना सांगून क्षमायाचना करत होतो.

२. गुरुदेवांच्या कृपेने दिवसभर सत्मध्ये रहाता येणे

२ अ. भावसत्संगात सांगितलेली सूत्रे एकमेकांना सांगणे : पूर्वी भावसत्संगात सांगितलेली सूत्रे आम्ही लिहून घेतली होती. या काळात आम्हाला त्याचा उपयोग झाला. आम्ही ती सूत्रे वाचून विस्ताराने एकमेकांना सांगत होतो. त्यात आमचा १ ते दीड घंटा वेळ जायचा.

२ आ. काही दिवसांनी आम्हाला घरी सत्सेवा उपलब्ध झाली. आमची दिवसभरात २ घंटे सत्सेवा व्हायची.

२ इ. यू ट्यूब वाहिनीवरील ऑनलाईन सत्संगांचा लाभ होणे : याच कालावधीत आम्हाला यू ट्यूबवरील ऑनलाईन नामसत्संग, भावसत्संग आणि ग्रंथांचे वाचन, यांचाही लाभ झाला. दुपारी १ घंटा विश्रांती घेऊन अन्य वेळी आम्ही गुरुदेवांच्या कृपेने सत्मध्ये रहात होतो.

पहिल्या दळणवळण बंदीच्या वेळी आमचे नातेवाइक त्यांच्या घरीच होते. ते आम्हाला भ्रमणभाष करून वेळ जात नाही, असे सांगायचे; मात्र गुरुदेवांच्या कृपेने आम्ही सत्मध्ये कसे रहातो ?, हे त्यांना कळायचे नाही. गुरुदेवांनी या माध्यमातून आमच्यावर किती मोठी कृपा केली आहे !, हेे लक्षात आले.

२ ई. आश्रमात जाऊन-येऊन सेवा करण्याची अनुमती मिळणे : पहिली दळणवळण बंदी उठवल्यानंतर आम्हाला काही बंधने पाळून आश्रमात येण्याची अनुमती मिळाली. त्या वेळी गोवा राज्य ग्रीन झोन मध्ये होते. त्या कालावधीत आम्ही आपत्काळासाठी ३ ते ४ मास टिकेल, एवढे किराणा साहित्य घरात आणून ठेवले होते. त्यानंतर आम्ही ३० ते ४० दिवस आश्रमात जाऊन-येऊन सेवा करत होतो.

२ उ. पुन्हा दळणवळण बंदी चालू होणे आणि ३ मास घरी रहावे लागणे : त्यानंतर देशाच्या अंतर्गत दळणवळण चालू झाले. गोवा राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यानंतर आम्ही ३ मास घरी होतो. आम्ही रहात असलेल्या इमारतीत खालच्या माळ्यावर रहाणार्‍या एका कुटुंबात कोरोनाचे ३ रुग्ण सापडले. ते गृहअलगीकरणात होते. त्या वेळी आम्हाला बाहेर पडणेही कठीण झाले होते.

३. या कालावधीत देवाने केलेले साहाय्य

अ. देवाने २ मासांपूर्वी आम्हाला किराणा माल भरून ठेवण्याची बुद्धी का दिली ?, हे लक्षात आले. ते किराणा साहित्य आम्हाला ३ मास पुरले.

आ. मनावरील ताण दूर व्हावा, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दैनिक सनातन प्रभात मधून काही स्वयंसूचना सत्रे प्रसिद्ध केली होती. त्यांचाही मला लाभ झाला.

४. अनुभूती

अ. भावसत्संग चालू करण्यापूर्वी माझी पत्नी भावार्चना करून भावपूर्ण प्रार्थना करत असे. त्या वेळी सुखासनाजवळील आसंदीवर परात्पर गुरु डॉक्टर बसले आहेत, असे आम्हाला जाणवायचे.

आ. कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीत आमचे काही नातेवाइक आणि मित्र यांचे निधन झाले. काहीना कोरोना झाला, अशी वृत्ते येत होती, तरीही देवाने आम्हाला स्थिर आणि आनंदात ठेवले होते.

इ. रामनाथी आश्रमापासून आमचे घर ३ कि.मी. अंतरावर आहे. घरातही रामनाथी आश्रमातील चैतन्य मिळत आहे, असे आम्हाला जाणवायचे. एरव्ही आम्ही कुठे बाहेर रहायला गेलो असतो, तर आमच्यावर अधिक रज-तमाचे आवरण आले असते; परंतु या कालावधीत आम्हाला गुरुकृपेने तसे काही जाणवले नाही. आम्ही आनंदी होतो.

५. कृतज्ञता

देवाने आपत्काळातही आमच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेतले. हे सर्व अनुभवल्यानंतर गुरुदेवांनी आमच्यासाठी किती केले !, याची जाणीव होऊन माझी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त झाली. माझे मन भरून आले.

६. प्रार्थना

हे गुरुदेवा, आपणच या आपत्काळात आम्हाला स्थिर ठेवून आमच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेतले, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. दिलीप नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक