ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांवर फेकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा लागल्याने अनेकांना गंभीर इजा

कुठे सात्त्विक हिंदु नववर्ष, तर कुठे जनतेची गैरसोय करणारे रज-तमप्रधान पाश्‍चात्त्य नववर्ष !

ख्रिस्ती नववर्षदिनी पर्यटकांना समुद्रकिनार्‍यांवरील नियम लागू होत नाहीत का ?

समुद्रकिनार्‍यांवर फेकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या

पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी कळंगुट, बागा आदी समुद्रकिनार्‍यांवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे तेथे फिरणार्‍या पर्यटकांंच्या पायात काचा घुसल्याने गंभीर घाव झाले आहेत. या समुद्रकिनार्‍यांवर ३१ डिसेंबर या दिवशी सहस्रो पर्यटकांनी भेट दिली होती. पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यावर मद्यप्राशन करून बाटल्या किनार्‍यावर फेकून दिल्या.

‘दृष्टी मरिन’ यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या बाटल्यांवर पाय पडल्याने पायाला दुखापत होण्याच्या मागील काही दिवसांत १० हून अधिक घटना घडल्या आहेत. स्थानिक मासेमार आणि ‘वॉटरस्पोर्ट’चे कर्मचारी यांनाही काच लागल्याने दुखापत झाली आहे. २ जानेवारी या दिवशी बागा येथे एका १० वर्षीय मुलाला काच लागल्याने पायाला गंभीर घाव झाला. मुलाच्या पायातून रक्तस्राव झाल्याने त्याला त्वरित रुग्णवाहिकेतून रुग्णालयात भरती करण्यात आले. पाळोळे, काणकोण येथेही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. समुद्रकिनार्‍यांवर पुरेशा प्रमाणात कचरापेट्या उपलब्ध केल्यास या दुर्घटना टाळता आल्या असत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (पर्यटकांकडून प्रशासनाला महसूल मिळतो; म्हणून स्थानिकांनी ध्वनीप्रदूषण सोसायचे, मासेमारांनी पायाला बाटल्यांच्या काचांमुळे होणारा घाव सोसायचा असे आहे का ? – संपादक)