एन्.सी.ई.आर्.टी.च्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात पालट
वर्णव्यवस्थेविषयीही उल्लेख
(एन्.सी.ई.आर्.टी. : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
नवी देहली – एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात ‘मनुस्मृति’मधील एका श्लोकाचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात म्हटले आहे की, वैदिक काळात महिलांना सन्मानाचे स्थान होते; मात्र कालांतराने त्यांच्या सामाजिक स्थितीत विविध पालट झाले आणि काही कालखंडांत त्यात घसरणही दिसून आली.
मनुस्मृतीचा उल्लेख पुस्तकातील कोणत्या प्रकरणात केला ?
पाठ्यपुस्तकातील ‘इसवी सन १००० पर्यंतचे राज्य आणि समाज’ या प्रकरणात म्हटले आहे की, वैदिक काळाचे वर्णन असा काळ म्हणून केले जाते, जेव्हा महिलांना समाजात उच्च आणि सन्माननीय स्थान होते.
स्त्री-ऋषींचाही उल्लेख !
प्रकरणात पुढे लिहिले आहे की, स्त्रिया विद्वत्तापूर्ण शिक्षणात सहभागी होत असत. काही विशिष्ट प्रसंगी महिला पुरुषांच्या बरोबरीने धार्मिक विधी करत असत आणि सार्वजनिक समारंभांमध्येही भाग घेत असत. ऋग्वेदातील अनेक ऋचांचे श्रेय पारंपरिकरीत्या अपाला, विश्ववारा, घोषा आणि लोपामुद्रा यांसारख्या विदुषींना दिले जाते.
त्यानंतर त्यात मनुस्मृती ३.५६ चा संदर्भ दिला आहे, ज्यानुसार ‘जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, तिथे देव प्रसन्न होतात; जिथे त्यांचा सन्मान केला जात नाही, तिथे सर्व धार्मिक विधी निष्फळ ठरतात.’
पाठ्यपुस्तकातील अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे अशी…!
१. मनुस्मृति हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे, ज्यात समाज आणि कायदा यांच्याशी संबंधित नियम मांडले आहेत. जात आणि स्त्रिया यांचे स्थान यांविषयी हा ग्रंथ दीर्घकाळापासून चर्चा अन् वाद होत आहे.
२. तथापि हेही लक्षात घेतले पाहिजे की, काळाच्या ओघात स्त्रियांचे स्थान स्थिर राहिले नाही. विविध युगांमधील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनांमुळे स्त्रियांच्या स्थितीत कधी सुधारणा झाली, तर कधी घसरण झाली. तरीही स्त्रिया अनेक क्षेत्रांत सक्रीय राहिल्या. घरकाम, शेती, हस्तकला आणि धार्मिक कार्ये यांमध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले.
३. गुप्त-वाकाटक काळातील साहित्यात अशा स्त्रियांचे वर्णन आढळते, ज्या सुशिक्षित आणि कलांमध्ये निपुण होत्या. ऐतिहासिक नोंदींवरून असेही समजते की, अनेक राण्यांनी राज्यकारभार आणि धार्मिक कार्यांच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
४. या संदर्भात वाकाटक राज्याची शासक प्रभावती गुप्त यांचे उदाहरण दिले जाते. त्याच वेळी संगम साहित्यात स्त्रियांना समाज आणि अर्थव्यवस्थेतील सक्रीय सहभागी म्हणून चित्रित केले आहे.
सामाजिक भूमिकांच्या आधारे स्थापित झालेली वर्णव्यवस्था !
या प्रकरणात हेही स्पष्ट केले आहे की, आरंभीच्या वैदिक समाजात व्यक्तीची सामाजिक ओळख केवळ जन्मावर अवलंबून नसे; इतर घटकही महत्त्वपूर्ण होते. आरंभी वैदिक ग्रंथांमध्ये जन्मावर आधारित निश्चित सामाजिक दर्जाचा उल्लेख आढळत नाही. त्याऐवजी असे मानले जाते की, सामाजिक ओळख ही वांशिक गट, उप-गट, प्रदेश, गाव, भाषा, व्यवसाय आणि विशेषतः सांस्कृतिक संबंध यांसारख्या घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांतून घडत असे. ऋग्वेदातील पुरावे एकाच कुटुंबातही व्यावसायिक विविधता असल्याचे दर्शवतात आणि एका सूक्ताचा संदर्भ दिला जातो, ज्यात म्हटले आहे, ‘मी कवी आहे; माझे वडील वैद्य आहेत; माझी आई धान्य दळण्याचे काम करते.’
मूल्यव्यवस्थेवर आधारित वर्ण !
प्रकरणात पुढे म्हटले आहे की, समाजात कालांतराने चार वर्णांच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) विशिष्ट भूमिका विकसित झाल्या. तथापि आरंभीच्या काळात या वर्णांकडे कठोर सामाजिक गट म्हणून पाहिले जात नसे, तर लोकांची कामे आणि दायित्वे यांवरून त्यांची ओळख ठरत असे. दुसर्या शब्दांत सांगायचे, तर वर्णव्यवस्थेचा आरंभीचा उद्देश लोकांना विशिष्ट वर्गांमध्ये कठोरपणे विभागणे हा नसून समाजातील कामांची विभागणी करणे हा होता. अशा प्रकारे वर्ण ही संकल्पना अशा मूल्यव्यवस्थेवर आधारित होती जिथे ज्ञानाला सर्वोच्च स्थान दिले जात असे आणि त्यानंतर राजकीय सत्ता अन् संपत्ती यांना स्थान होते. ‘सुत्त निपात’ या बौद्ध ग्रंथाचा संदर्भ देऊन यावरही भर दिला गेला की, सामाजिक प्रतिष्ठा ही जन्मावर नव्हे, तर व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते.

बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati