Jamaat E Islami Protest : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर ‘जमात-ए-इस्लामी’कडून मोर्चा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न

गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळा जाळला

ढाका (बांगलादेश) – येथे कट्टरतावादी राजकीय पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ने भारतीय दूतावासाच्या दिशेने मोर्चा काढला आणि भारतीय दूतावासावर आक्रमण  करण्याचा प्रयत्न केला. कट्टरपंथियांच्या मोर्चाला ढाका पोलिसांनी भारतीय उच्चायोगाकडे जाण्यापासून रोखले. बांगलादेशी पत्रकार सलाह उद्दीन शोएब चौधरी यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले की, जमात-ए-इस्लामीच्या अनेक प्रमुख नेत्यांनी इतर इस्लामी पक्षांसमवेत मिळून ढाक्यातील भारतीय उच्चायोगावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळाही जाळला आणि ‘बांगलादेश आझाद पार्टी’ नावाच्या नवीन आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

१. जमात-ए-इस्लामी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ११ पक्षीय कट्टरपंथी आघाडीने भारताविरुद्ध एक नवीन अन् मोठी आघाडी उघडली आहे. या आघाडीचा मुख्य उद्देश भारत-बांगलादेश सीमेवर कथित ‘पुश-इन’ म्हणजेच बळजबरीने सीमा ओलांडून पाठवणे आणि ‘सीमेवरील गोळीबारा’ला विरोध करणे आहे. बांगलादेशात भारताविरुद्ध अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. आघाडीने म्हटले आहे की, राजधानीत गोलमेज चर्चेसोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संमेलनेही आयोजित केले जातील.

२. १० जूनला मोगबाजार येथील जमात-ए-इस्लामीच्या मध्यवर्ती कार्यालयात आघाडीने एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये भारताविरुद्ध देशभरात कार्यक्रम राबवण्याबाबत सांगण्यात आले होते. सीमावर्ती भागातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतांना आघाडीच्या संपर्क समितीचे समन्वयक आणि जमातचे साहाय्यक सरचिटणीस ए.एच्.एम्. हामिदुर रहमान आझाद म्हणाले की, देश राजकीय अस्थिरता, सीमेवरील हत्या आणि वाढत्या किमती या समस्यांशी झुंज देत आहे. गेल्या १०० दिवसांत भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात १९ बांगलादेशी ठार आणि २४ घायाळ झाले, असा आरोप जमात नेत्याने केला.

३. जमात आघाडीचा दावा आहे की, गेल्या ३ महिन्यांत भारताकडून २ सहस्र ४०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना बळजबरीने सीमा ओलांडून पाठवण्याचे प्रयत्न झाले आहेत. (याच कालावधीत झालेल्या बांगलादेशातील शेकडो हिंदूंवरील आक्रमणांवर मात्र जमात मूग गिळून गप्प बसते, हे लक्षात घ्या !  संपादक)

संपादकीय भूमिका

भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?