वर्ष २०२२-२३ मध्ये मुंबईतील ४ सहस्र ६३ झाडे काँक्रिटीकरणापासून मुक्त; पण अद्यापही ते प्रकार चालूच !

मुंबई – काही दिवसांपूर्वी शहरात झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हा प्रश्न विरोधकांनी विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला. मुंबईत काँक्रिटीकरणामुळे झाडे पडत असल्याचा निष्कर्ष काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. वर्ष २०२२-२०२३ मध्ये मुंबईमध्ये तब्बल ४ सहस्र ६३ वृक्ष काँक्रिटीकरणापासून मुक्त करण्यात आले; मात्र त्यानंतरही असे प्रकार चालू आहेत.

वर्ष २०२३ मध्ये विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आणि विलास पोतनीस यांच्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती सभागृहात देण्यात आली होती. त्यावर महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात येत असून उचित कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. काँक्रिटीकरणामुळे झाडांना श्वासोच्छ्श्वास करण्यात अडचण येते, तसेच झाडांची मुळे खोलवर जाण्यास मर्यादा येतात, असे निष्कर्ष तज्ञांनी वर्तवले आहेत. त्यामुळेच ‘झाडाच्या बुंध्याभोवती १ मीटर जागा सोडूनच रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे’, असे राष्ट्रीय हरित लवादाचे धोरण आहे; मात्र या धोरणाला रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करणारे ठेकेदार हरताळ फासत आहेत.