आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) आगारांच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा सिद्ध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर करावे’, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले. १३ मे या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी परिवहन विभागाची बैठक झाली. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन त्यांचे स्वतंत्र नियोजन करावे. जागेची मालकी कायम स्वत:कडेच राहील. या दृष्टीने ४९ वर्षांहून अधिक कालावधीसाठी एस्.टी. महामंडळाच्या जागा भाडेतत्वावर देण्याचा विचार चालू आहे. त्यामुळे आगारांच्या जागांचे प्रभावी व्यावसायिक मूल्यवर्धन साधता येईल.

‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित करावा !

सार्वजनिक वाहतूक सेवा प्रवाशांसाठी अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी  एस्.टी. आगार, मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचे एकात्मिक नियोजन करून ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ (विविध वाहतूक व्यवस्थेची सेवा एकाच ठिकाणी मिळेल, असे केंद्र) विकसित करण्यावर भर द्यावी, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.