धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

शहापूर येथे ८९७ आदिवासींची घरवापसी !

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

ठाणे – आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आदिवासी समाजाचे होणारे धर्मांतर रोखणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे विश्व हिंदु परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितले. परिषदेच्या वतीने शहापूर तालुक्यातील चेरवली येथे आयोजित हिंदु संमेलनात ४९९ कुटुंबांतील ८९७ धर्मांतरित आदिवासी व्यक्तींनी हिंदु धर्मात पुनरागमन केले. या कार्यक्रमात परांडे बोलत होते.

मिलिंद परांडे म्हणाले की, ब्रिटिशांविरोधात लढा उभारणारे क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आणि नाग्या कातकरी यांच्या वारसांना ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रलोभने दाखवून धर्मांतर केले जात आहे. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जनजाती समाजाने उभारलेला संघर्ष पुढे नेण्याचे दायित्व आपले आहे. भूमी बळकावणे आणि धर्म बाटवणे यांसाठी केली जाणारे षड्यंत्रे हाणून पाडण्याची आवश्यकता असून त्यासाठी कृतीप्रवण झाले पाहिजे.

या संमेलनाला डॉ. परमहंसजी महाराज, महंत मोहनदास महाराज, विहिंपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.