QUAD Foreign Ministers Meeting : समुद्री मार्गांचे स्वातंत्र्य राखणे आवश्यक असून ‘क्वाड’ कोणत्याही प्रकारचे ‘टोल’ (शुल्क) लावण्यास विरोध करतो ! – ऑस्ट्रेलिया

देहली येथे झाली ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक

(क्वाड देश म्हणजे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. ४ देशांचा हा गट अमेरिकेने प्रामुख्याने चीनचे या क्षेत्रातील वर्चस्व अल्प करण्यासाठी बनवलेला गट आहे.)

नवी देहली – इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा परिणाम ऊर्जा सुरक्षेवर स्पष्टपणे दिसत आहे. समुद्री मार्गांचे स्वातंत्र्य राखणे आवश्यक आहे आणि ‘क्वाड’ देश कोणत्याही प्रकारचा टोल (शुल्क) लावण्यास विरोध करतात. क्वाड सदस्य देश केवळ चर्चेवर नव्हे, तर ठोस निष्कर्षांवर लक्ष केंद्रित करत आहेत, असे सूत्र ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. या बैठकीत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. अमेरिकेकडून मार्को रुबियो, जपानकडून तोशिमित्सु मोतेगी आणि ऑस्ट्रेलियाकडून पेनी वोंग उपस्थित होत्या.

या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी आतंकवादाच्या सूत्रावर बोलतांना सांगितले की, या विरोधात शून्य सहनशीलता असावी. ज्या देशांवर आतंकवादी आक्रमणे होतात, त्यांना स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आहे.