Advocate Asim Sarode : (म्हणे) ‘सनातनी प्रवृत्तींकडून लघु कुंभमेळ्याच्या माध्यमातून प्रतिगामी विचारांना खतपाणी !’

अधिवक्ता असीम सरोदे

सातारा, २५ मे (वार्ता.) – सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज, नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि राजर्षी शाहू महाराज यांना वाई येथील कर्मठ सनातनी प्रवृत्तींकडून विरोध झाला होता. राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणार्‍या सनातनी शक्तींविरुद्ध स्वामी केवलानंद सरस्वती यांनी धर्मसुधारणेचा लढा उभारला होता. सध्या सनातनी प्रवृत्तींकडून लघु कुंभमेळ्याच्या माध्यमातून प्रतिगामी विचारांना खतपाणी घातले जात आहे, असे मत अधिवक्ता असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

अधिवक्ता सरोदे म्हणाले, ‘‘वाई येथील लघु कुंभमेळ्यासाठी सरकारकडून १ कोटी ५० लाख रुपये व्यय केले जात आहेत. या रकमेचा विनियोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी केला जात आहे ? याची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. लघु कुंभमेळ्यासाठी उपस्थित साधू-संत कोण आहेत ? त्यांची पार्श्वभूमी काय आहे ? समाजकारणातील त्यांचे योगदान काय आहे ? याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. देशभरात अनेक ठिकाणी काही तथाकथित बाबांवर अमली पदार्थ सेवन, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या लघु कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या साधूंची पार्श्वभूमी पडताळणे आवश्यक आहे.’’

संपादकीय भूमिका

  • अधिवक्ता सरोदे लघु कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे देव आणि धर्म मानत नाहीत, त्यांनी कुंभमेळ्यासारख्या धार्मिक गोष्टींत नाक खूपसू नये !
  • राज्यपालांसारख्या घटनात्मक पदांना ‘फालतू’ संबोधल्यामुळे ज्यांची सनद काही महिने रहित झाली होती, ते अशा प्रकारची निराधार वक्तव्ये करून स्वत:चे हसेच करून घेत आहेत, हे वेगळे सांगायला नको !
  • प्रासंगिकता न राहिलेल्या सरोदे यांच्यासारख्यांकडून अशी वक्तव्ये सवंग लोकप्रियतेसाठीच केली जात आहेत. जनाधार नसलेल्या (‘फ्रिंज एलिमेंट्स’ असलेल्या) अशांची कीव करावी तेवढी थोडी !