कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

केरळमध्ये घुसखोरांना वसवण्यासाठी मोठे जाळे कार्यरत आहे का ?, याचे अन्वेषण चालू

कोच्चि (केरळ) – कोच्चिजवळील एरूर, त्रिपुनिथुरा येथे २५ जूनला केरळ पोलीस, आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त मोहिमेत ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. येथील दोन भाड्याच्या घरांमध्ये ते अवैधपणे रहात होते. मेदी हसन (वय ३२ वर्षे), महंमद असीम (वय ३९ वर्षे), तारिक (वय २१ वर्षे), सोखिर (वय १७ वर्षे), महंमद सोहेल (वय ३३ वर्षे) आणि महंमद मिजान अशी अटक करण्यात आलेल्या घुसखोरांची नावे आहेत. ते भंगार गोळा करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे भारतात रहाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा कायदेशीर अनुमती (पारपत्र) नव्हती. अशा लोकांना वसवण्यामागे एखादे मोठे जाळे कार्यरत आहे का ?, याचे अन्वेषण केले जात आहे.

याच्या आदल्या दिवशी २४ जूनला केरळ आतंकवादविरोधी पथकाने १९ वर्षीय मोशिउर खान उपाख्य अमन खान याला अटक केली. तो येथील ‘करुणागप्पल्ली पुथेनथेरुवू मुस्लिम जमात मशिदी’च्या अंतर्गत असलेल्या ‘शरियातुल इस्लाम मदरशात’ राहून शिक्षण घेत होता. अधिकार्‍यांनी त्याच्याकडून आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्रासह बनावट भारतीय कागदपत्रे जप्त केली.

राज्यात सहस्रो बांगलादेशी घुसखोर असल्याचे भय !

गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते रेस्टॉरंट चालवणे, मदरशांमध्ये शिक्षण घेणे, मजुरी करणे आदी कामांमध्ये गुंतलेले असल्याचे आढळले आहे. केरळमध्ये अनुमाने ३५ ते ४० लाख स्थलांतरित कामगार आहेत. ते भारतातील २५ राज्यांमधून आलेले आहेत. केवळ पेरुंबावूरमध्येच त्यांची संख्या १ लाख ते १.५ लाख इतकी असल्याचा अंदाज आहे. केरळमधील लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्यात सहस्रो बांगलादेश घुसखोरांचाही समावेश आहे; कारण भाषांमधील साम्यामुळे कोण भारतीय आहे आणि कोण बांगलादेशी ?, हे ओळखणे कठीण जाते.