ज्याला परीक्षा घ्यायची असेल, त्याने दरबारात यावे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

अधर्माचा पुरस्कार करणार्‍या शाम मानवांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना आव्हान दिल्याचे प्रकरण

शाम मानव व पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

नागपूर – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या चमत्कारांना आव्हान देत ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने पारितोषिकाची रक्कम ३० लाख रुपयांवरून ८० लाख रुपये केली आहे. समितीचे संयोजक शाम मानव यांनी हे आव्हान दिले असून त्याला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘ज्याला परीक्षा घ्यायची असेल, त्याने दरबारात यावे’, असे प्रत्युत्तर दिले. शाम मानव यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आव्हानाच्या अटींची माहिती दिली.

शाम मानव यांनी दिलेल्या आव्हानाच्या अटी !

१. ही चाचणी केवळ नागपूरच्या पत्रकार भवनामध्येच होऊ शकेल.

२. एक पंच समिती स्थापन केली जाईल. याला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची संमतीही असेल. चाचणीच्या वेळी ते आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांचे भ्रमणभाष सीलबंद केले जातील.

३. महाराजांसमोर अचानक १० अनोळखी व्यक्ती आणल्या जातील. महाराजांना त्या व्यक्तींचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, आडनाव आणि भ्रमणभाष क्रमांक सांगावा लागेल, तसेच जवळ ठेवलेल्या १० वस्तूंची ओळख त्यांच्या ‘दिव्य दृष्टी’ने करून द्यावी लागेल.

४. जर ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले, तर ५ दिवसांनंतर नवीन लोकांसमवेत हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल. दोन्ही वेळा ९० टक्के अचूक निकाल आल्यास त्यांना ८० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तर्क आहे की, दरबारात माहिती गोळा करण्याचे गुप्त मार्ग असू शकतात. त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. जर महाराजांनी स्वतःला सिद्ध केले, तर मी त्यांच्या चरणांवर माथा टेकीन, माझी संस्था बंद करीन आणि त्यांचा भक्त होईन. महाराज आव्हान स्वीकारणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, निष्पक्ष आव्हानात सहभागी झाल्यास धंदा बंद होईल. यामुळे ते पळून गेले. त्यांचे कार्य ढोंगी आहे.

आम्ही जादूगार नाही, ही ईश्वरी प्रेरणा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

या आव्हानाला उत्तर देतांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले, ‘‘आम्ही जादूगार नाही. आम्हाला ईश्वर जी प्रेरणा देईल, त्यानुसार आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो.’’

 

संपादकीय भूमिका

  • हिंदु संतांच्या कार्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची मानहानी करण्याचा प्रकार म्हणजे नास्तिकांचे वैचारिक प्रदूषणच !
  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दरबारात येऊन सत्य जाणून न घेता स्वतःच्याच अटी लादून त्यांना अडचणीत आणण्याचा शाम मानवांचा हा प्रयत्न फोल ठरेल, असे भाविकांना वाटते !