देशातील सर्व हिंदु मंदिरे हिंदूंकडेच सोपवा ! – Vishva Hindu Parishad

‘चर्च आणि मशीद सरकारी नियंत्रणात नाहीत, मग मंदिरेच का ?’ - महामंत्री मिलिंद परांडे यांचा सरकारला प्रश्न

श्री. मिलिंद परांडे (मध्यभागी)

शिर्डी (अहिल्यानगर) – देशातील हिंदूंची सर्व मंदिरे हिंदूंकडेच सोपवण्यात यावीत. मंदिरे सांभाळणे हे सरकार किंवा न्यायालय यांचे काम नाही. कोणतेही चर्च किंवा मशीद सरकारच्या नियंत्रणाखाली नाही, मग केवळ हिंदूंच्या मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, असा परखड प्रश्न विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी उपस्थित केला. ते शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूच करतील !

श्री. मिलिंद परांडे म्हणाले की, ‘हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूच करतील’, या विचाराने देशातील विविध हिंदु संघटना एकत्र आल्या आहेत. आम्ही या विषयावर देशातील सर्व खासदार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन जनजागृती करत आहोत. या वर्षाअंती सर्व लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा येथे ‘मंदिर मुक्ती’चा विषय मांडतील.

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी देशात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ हवा !

परांडे पुढे म्हणाले की, देशात एका विशिष्ट वर्गाकडून नियोजित पद्धतीने ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडवल्या जात आहेत. हिंदु समाजाने या विरोधात सक्षम होणे आवश्यक आहे. परकीय मिशनर्‍यांना धर्मांतरासाठी मिळणार्‍या निधीवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.
संसदेमधील आकडे सांगतात की, मागील वर्षी १८ सहस्र कोटी रुपये एफ्.सी.आर्.ए. (‘फॉरेन कॉन्ट्रुब्युशन रेग्युलेशन ॲक्ट’ अर्थात् परकीय योगदान नियमन अधिनियमच्या) अंतर्गत मिशनर्‍यांना देण्यात आले आहेत. हिंदु धर्माच्या विरोधात पैसे दिले जात आहेत. यावर बंदी घातली पाहिजे. धर्मरक्षणासाठी प्रत्येक राज्यात विधेयक संमत झाले पाहिजे. भाजपशासित राज्यांनी ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’कायदा आता संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बंगालमधील परिवर्तन देशाच्या सुरक्षेसाठी पूरक !

बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता आल्याविषयी आनंद व्यक्त करतांना ते म्हणाले की, हिंदुहित हेच देशहित आहे. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता तेथे हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आल्याने देशाच्या सीमा आणि सुरक्षा अधिक भक्कम होईल.