Pinaki Gangopadhyay : हिंदू ऐक्यामुळेच बंगालमध्ये भाजपचा विजय !

बंगाल निवडणुकीविषयी राजकीय विश्लेषक पिनाकी गंगोपाध्याय यांचे विश्लेषण

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल फारच आश्चर्यकारक ठरला आहे. येथील जनतेत एवढी वर्षे भीती व्याप्त होती. भाजपने ती भीती प्रभावीपणे मोडून काढली. या भागांमधील हिंदू मतपेटी मोठ्या संख्येने एकवटली. विशेषतः ५० टक्क्यांहून अधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या मुर्शीदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर या भागांमध्ये भाजपला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य मानले जात होते; पण यंदाच्या निवडणुकीत ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. ‘जर मुसलमान लोकसंख्या अधिक असेल, तर भाजप जिंकू शकत नाही’, हे  समीकरण आता पुसले गेले आहे. भाजपने मुसलमानबहुल आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक बालेकिल्ले भेदले आहेत, असे निरीक्षण बंगालमधील राजकीय विश्लेषक आणि हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. पिनाकी गंगोपाध्याय यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना नोंदवले.

मुसलमानांच्या मतांचे विभाजन !

श्री. पिनाकी गंगोपाध्याय

श्री. गंगोपाध्याय पुढे म्हणाले की, भाजप केवळ हिंदु उमेदवारामुळे जिंकला नाही. तो जिंकला कारण या मतदारसंघांमधील हिंदूंच्या मतांनी विलक्षण शिस्तीने आणि एकजुटीने मतदान केले. मुसलमानांचा तृणमूल काँग्रेसवर अविश्वास होता, ज्यामुळे त्यांची निष्ठा तृणमूलऐवजी अन्य मुसलमानांच्या पक्षांकडे गेली. उदा. माकप, काँग्रेस, इंडियन सेक्युलर फ्रंट आणि हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पक्ष यांकडे मुसलमानांची मते विभागली गेली. एका बाजूला मुसलमान मतांची विभागणी आणि दुसर्‍या बाजूला हिंदू मतांचे एकत्रीकरण, यामुळे भाजपचा विजय झाला.

ममता बॅनर्जी सरकारकडून भ्रमनिरास !

ते पुढे म्हणाले की, या सगळ्यामागचा गहन संदेश हा आहे की, या जागा जिंकण्यासाठी भाजपला स्वतःची ओळख लपवण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना दिखाऊपणा करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी हिंदु उमेदवार उभे केले आणि तरीही ते जिंकले; कारण मतदारांनी कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, घुसखोरी, महिला सुरक्षा, स्थानिक दहशत आणि सत्ताधार्‍यांची विश्वासार्हता यांसह सत्ताविरोधी घटकाकडे पाहिले. भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे आणि ममता सरकारने या भागांमध्ये विकासाची पूर्ण न केलेली  आश्वासने, यांमुळे मुसलमान मते तृणमूलपासून दूर झाली आणि इतर पक्षांत विभागली गेली. हा एक खरा राजकीय भूकंप आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर येथील भाजपचा विजय हे दाखवून देतो की, एकदा हिंदु मते एकवटली आणि अल्पसंख्यांक मतांमध्ये विभाजन झाले की, तृणमूलचा सर्वांत शक्तीशाली किल्लेही कोसळू शकतात.