बंगालमधील विजय हा घुसखोरी आणि आतंकवाद यांपासून देशाला वाचवणारा ! – CM Devendra Fadnavis

विजयीसभेत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – बंगालमधील विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. भारतामधील घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया या सर्व धोक्यांपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी येथील यशाविषयी भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या येथे आयोजित विजयीसभेत मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी बंगालमध्ये ३० वर्षे काँग्रेसचे, ३६ वर्षे डाव्यांचे आणि १५ वर्षे तृणमूल काँग्रेस यांचे सरकार होते. एकेकाळी बंगाल हे देशातील पहिले औद्योगिक केंद्र होते; परंतु ममता बनर्जी यांच्या काळात बंगालमध्ये जंगलराज निर्माण झाले. जनतेने मतदानपेटीद्वारे जंगलराजच्या विरोधात असंतोष व्यक्त केला आहे. भारताच्या सुरक्षिततेसाठी बंगालमधील विजय महत्त्वाचा आहे.’’