Canada CSIS Report : खलिस्तानी घटकांपासून कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका !

  • कॅनडातील गुप्तचर विभागाच्या अहवालातील माहिती !

  • चीन, रशिया आणि भारत यांच्याकडून हेरगिरी होत असल्याचा दावा

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या सुरक्षा गुप्तचर विभागाने वर्ष २०२५ चा वार्षिक अहवाल संसदेला सादर केला आहे. या अहवालात मान्य करण्यात आले आहे की, खलिस्तानी घटकांमुळे कॅनडाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. चीन, रशिया आणि भारत यांनी हेरगिरीच्या माध्यमातून कॅनडाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

या अहवालात नमूद केले आहे की,

१. खलिस्तान्यांकडून हिंसक कृत्यांना खतपाणी !

कॅनडामध्ये सक्रीय असलेल्या खलिस्तानी घटकांच्या हालचाली सतत एका हिंसक टोकाच्या कार्यसूचीला खतपाणी घालत आहेत.  गेल्या वर्षी ‘एअर इंडिया फ्लाईट १८२’ मधील बाँबस्फोटाला ४० वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणातील संशयित कॅनडास्थित खलिस्तानी आतंकवादी गटांचे सदस्य होते. कॅनडाच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण मानले जाते, ज्यामध्ये ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतांश कॅनडाचे नागरिक होते.

२. जहालमतवादी गटांच्या कारवायांमुळे धोका !

आतंकवादी गटांच्या कारवाया कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हित यांसाठी सतत धोका बनत आहेत. यातील काही लोक कॅनडाच्या संस्थांचा वापर करून हिंसक कार्यसूची पुढे रेटतात आणि समुदायाकडून पैसा गोळा करतात. पुढे या पैशांचा वापर हिंसक कारवायांसाठी केला जातो.

३. चीन, रशिया, भारत, इराण, पाकिस्तान आदींवर आरोप !

पालटत्या जागतिक परिस्थितीत चीन, रशिया, भारत, इराण, पाकिस्तान आणि इतर काही देश कॅनडाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताने कॅनडाचे नेते, पत्रकार आणि भारतीय वंशाचे समुदाय यांच्याशी संबंध प्रस्थापित केले असून यामुळे कॅनडात सीमापार दमनाची स्थिती निर्माण झाली आहे. भारत सरकारवरील टीका दाबणे आणि समुदायात भीती निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे.

४. कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर भारतासमवेतच्या संबंधांत सुधारणा !

पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कॅनडाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे की, भारत सध्या कॅनडाच्या भूमीवर कोणत्याही हिंसक गुन्ह्यात किंवा धोक्यात सहभागी नाही. रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस प्रमुख माईक ड्युहेम यांनीही स्पष्ट केले की, कॅनडासाठी कोणत्याही परदेशी हस्तककाकडून थेट धोका असल्याचे सिद्ध झालेले नाही.