संपादकीय : खट्टर विरुद्ध कट्टर !

 

एरव्ही समुद्रकिनारे, पर्यटन आणि देवस्थाने यांसाठी ओळखले जाणारे गोवा गेल्या आठवड्यापासून वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. १० दिवसांपूर्वी गौतम खट्टर नावाच्या तरुणाने गोव्यातील एका कार्यक्रमात फ्रान्सिस झेविअरविषयी विधान केले. हे विधान आक्षेपार्ह असल्याचा आरोप करून झेविअरप्रेमी चवताळून उठले. खट्टर यांच्या अटकेसाठी झेविअरप्रेमींनी रान पेटवले. कुठे निदर्शने कर, कुठे आंदोलने कर, कुठे निवेदने दे, अशा सर्व मार्गांनी त्यांनी सरकारवर प्रचंड दबाव आणला. ज्यांना झेविअर कोण ?, हेसुद्धा ठाऊक नाही, असे लोकसुद्धा वार्‍याची दिशा पाहून ‘झेविअरप्रेमी’ बनले. आपल्याकडे असे काही घडले की, बिळातून बाहेर येऊन कोल्हेकुई करणार्‍यांची अजिबात कमतरता नाही. त्यांनाही झेविअरप्रेमाचा उमाळा आला. हे सर्व जण सामाजिक माध्यमांवर हिंदुत्वनिष्ठाविरुद्ध गरळओक करू लागले. त्यांना खलनायक ठरवू लागले. बघता बघता झेविअरप्रेमींनी गोवा पेटवले. हे सर्व पाहून गोव्याच्या पोलिसांना चेव चढला. एरव्ही दिवसाढवळ्या अमली पदार्थांची डोळ्यांसमोर तस्करी होत असतांना डोळ्यांवर पट्टी बांधून घेणार्‍या गोवा पोलिसांनी बाह्या सरसावून थेट उत्तराखंड गाठले. तेथे गौतम खट्टर सापडला नाही; म्हणून त्यांचा १८ वर्षांचा धाकटा भाऊ माधव खट्टर यांना उचलून आणले. माधव खट्टर निर्दाेष असल्याचे सर्वश्रुत आहे. त्याला नुकताच मिळालेला जामीनही अप्रत्यक्षपणे हेच सांगतो. हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) कशा प्रकारे रचले जाते ?, हे कळण्यासाठी हा सारांश उधृत करणे क्रमप्राप्त होते.

आता झेविअरविषयी ! गोव्यावरील पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीत जे प्रारंभीच्या काळात इन्क्विझिशन लादले गेले, ते फ्रान्सिस झेविअर याने पोर्तुगालच्या राजाला केलेल्या विनंतीवरून ! इन्क्विझिशन म्हणजे काय, तर जे मूर्तीपूजा करतात (म्हणजे हिंदू) त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावण्यासाठी त्यांच्यावर करण्यात येणारे अत्याचार ! म्हणजेच तो केवळ हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी गोव्यात आला होता. धर्मच्छलाविषयी अर्थात् ‘इन्क्विझिशन’विषयी ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या लेखकांच्या पुस्तकांचे खंडच्या खंडही उपलब्ध आहेत. त्यामुळे विस्तारभयास्तव झेविअरविषयी येथे सर्वच मांडणे अशक्य आहे; पण झेविअरप्रेमींनी या सर्व नोंदी, पुस्तके यांचा अवश्य अभ्यास केला पाहिजे. सांगायचे तात्पर्य इतकेच की, भावनिकतेपेक्षा वस्तूनिष्ठतेवर भर द्यायला हवा. झेविअर हा काही गोव्याचा विकास करायला आला नव्हता. त्याचा उद्देश स्पष्ट होता, दुर्दैवाने तो साध्य झाला. तरीही अशा व्यक्तीला ‘गोव्याचा साहेब’ म्हणणे, हा अडाणीपणा म्हणायचा कि कट्टरता ?

हिंदुद्वेष्ट्यांची साखळी !

पोलिसांनी गौतम खट्टर यांना ‘द्वेषपूर्ण भाषण’ (हेटस्पीच) केल्याच्या आरोपाखाली अटक केली. झेविअरची दुष्कृत्ये ही द्वेषपूर्ण न वाटणार्‍यांना खट्टर यांचे विधान द्वेषपूर्ण वाटते, यातच सर्व काही आले. हिंदुत्वनिष्ठांचे भाषण म्हणजे ‘हेटस्पीच’ आणि इतरांचे ते व्यक्तीस्वातंत्र्य ! हा दुटप्पीपणा सोयीचा आहे. याच प्रकरणात काही झेविअरप्रेमींनी हिंदु देवता, हिंदु समाज यांच्यावर अत्यंत गलिच्छ आणि शिवराळ भाषेत टीका करण्यास प्रारंभ केला. हिंदुत्वनिष्ठांनी त्याचे ‘स्क्रीनशॉट’ काढून पुरावा म्हणून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले; कारण पोलिसांचे लक्ष खट्टरकडे होते, त्यांना अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता ? पोलिसांनी गुन्हा नोंदवून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसली; पण संबंधितांना अटक मात्र केली नाही. परिणामी आजही ते हिंदुद्वेष्टे झेविअरप्रेमी मोकाट आहेत. उत्तराखंडला जाऊन नको त्याला उचलून आणण्याची मर्दुमकी दाखवणारे पोलीस अशा हिंदुद्वेष्ट्यांना शोधण्याची साधी तसदीही घेत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा हिंदुद्वेष्ट्या झेविअरप्रेमींनी केलेली टीका कुणाला ‘हेटस्पीच’ का वाटत नाहीत ? अशांमुळे समाजात तेढ निर्माण होते, असे कुणी का म्हणत नाही ?

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ सिद्ध करून अनेक जण त्यात हात धुवून घेत असतात. अशात प्रसारमाध्यमे अजिबात मागे नसतात. गोव्यातील एका कथित मोठ्या वर्तमानपत्राच्या उच्चपदस्थ व्यक्तीने या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्या व्यक्तीला ‘गोव्याचा निखिल वागळे’ म्हणता येईल ! या चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्याला निमंत्रित करण्यात आले होते. नंतर सामाजिक माध्यमांत या चर्चासत्राचा व्हिडिओ प्रसारित झाला. तो प्रसारित करतांना संपूर्ण चर्चासत्र प्रसारित न करता लबाडीने प्रवक्त्याचा मूळ वक्तव्याचा विपर्यास करून केवळ सोयीचा २७ सेकंदांचा भाग प्रसारित केला. त्याद्वारे समितीलाही या वादात ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला; पण हिंदुत्वनिष्ठ या षड्यंत्राला फसले नाहीत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे समितीच्या मागेच ठामपणे उभे रहाण्याची भूमिका घेतली. खरे म्हणजे अशा चर्चासत्रांचा उद्देश काय असतो ? तर त्याद्वारे एखाद्या विषयाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही अंगांनी सांगोपांग चर्चा होऊन जे समाजहिताचे आहे, ते लोकांसमोर आणणे अपेक्षित असते. ही चर्चा पहाणार्‍यांना असे समाजहित कुठेच दिसले नसेल, त्यांना समाजविघातकता मात्र निश्चित दिसली असेल !

म्हणूनच असा प्रकारसुद्धा हिंदुविरोधी कथानकाचा एक भाग असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. माध्यमांतील अशा झेविअरप्रेमींमुळे अशी वृत्तपत्रे खल‘नायक’च ठरतात !

खट्टर बाहेरचा, झेविअर आतला ?

या सर्व घटनाक्रमात गोव्यातील समस्त हिंदू खट्टर यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. हे तेच हिंदू आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी झेविअरचे अमानवी आणि अत्यंतिक क्रूर असे अत्याचार सोसले आहेत. एवढेच नव्हे, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही खट्टर यांचे समर्थन केले आहे. अनेक राज्यांतील हिंदूंनी त्या त्या भागातील पोलीस आणि प्रशासन यांना खट्टर यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात निवेदने दिली आहेत, तसेच हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या झेविअरप्रेमींना बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक वेगळा सूर ऐकायला मिळतो, तो म्हणजे गौतम खट्टर ‘बाहेरचा’ आहे. खट्टर यांना ‘बाहेरचा’ समजणार्‍यांना पोर्तुगिजाहून गोव्यात आलेला झेविअर ‘गोव्यातला’ वाटतो का ? तो विदेशी होता आणि चुकीच्या उद्देशाने गोव्यात आला होता, हे वास्तव हे लोक कधी स्वीकारणार ? असो, एक मात्र निश्चित की, जसे महाराष्ट्रात औरंगजेबप्रेमी आणि अफझलखानप्रेमी अन् कर्नाटकमध्ये टिपू सुलतानप्रेमी निपजले आहेत, तसे

गोव्यात आता झेविअरप्रेमी निर्माण झाले आहेत. आक्रमकांविषयी वाटणारे प्रेम ही डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळेच गोव्यात सध्या ‘खट्टर विरुद्ध कट्टर’ असे चित्र पहायला मिळत आहे. शेवटी ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतोय’, याची चिंता अधिक आहे ! त्यामुळे आता हिंदूंनीही ‘इनफ इज इनफ’ (आता पुरे झाले) असे म्हटले पाहिजे.

आक्रमकांच्या उदात्तीकरणाला देशद्रोह ठरवणारा कठोर कायदा करणे, ही काळाची आवश्यकता !